
फलटण मधून जाणार ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’; पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी
फलटण : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग (NH-965) प्रकल्पाची पाहणी करत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’ हा महत्त्वाकांक्षी महामार्ग फलटणमधून जाणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत गडकरी यांनी त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.
सकाळी दिवेघाट आणि जेजुरी येथील कामांची पाहणी केल्यानंतर गडकरी फलटण येथे दाखल झाले. सुरवडी (ता. फलटण) येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार परिषदेत त्यांनी पालखी महामार्गाच्या प्रगतीची माहिती दिली.
“पालखी मार्गाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवे घाटातील अडचणी दूर करून तेथील रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. उर्वरित काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” अशी माहिती गडकरी यांनी दिली. जेजुरी बायपासला स्थानिकांचा विरोध झाल्याने त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्गासाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत मी अत्यंत कडक आहे. रस्ता उत्तम दर्जाचाच झाला पाहिजे, हा माझा आग्रह आहे,” असे सांगत त्यांनी कामात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदारांनी मोठे सहकार्य केल्याचे नमूद केले.
या महामार्गावरील १३ पुलांच्या बांधकामात अत्याधुनिक ‘अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स काँक्रीट’ (UHPC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनावर भर देताना गडकरी म्हणाले की, “हा महामार्ग खऱ्या अर्थाने ग्रीन महामार्ग व्हावा, ही अपेक्षा आहे. वारकरी आणि प्रवाशांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे यासाठी जुन्या झाडांचे संवर्धन आणि नवीन वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.”
पालखी मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीलाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मार्गावर ४६ तलावांची निर्मिती करण्यात आली असून, ४० हजार नवीन झाडांची लागवड आणि ४५० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, शिवांजली भोसले, धनंजय साळुंखे-पाटील, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.








