Monday, September 14, 2026
Homeफलटणप्रवेशद्वाराविना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा; दोन-अडीच कोटींच्या खर्चानंतरही सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

प्रवेशद्वाराविना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा; दोन-अडीच कोटींच्या खर्चानंतरही सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचा कारभार सन १९८७ पासून सुरू असून आज जवळपास चार दशकांचा टप्पा पूर्ण होत आला आहे. या कालावधीत नगरपरिषदेच्या ६ ते ७ प्राथमिक शाळा स्वतःच्या सुसज्ज इमारतींमध्ये कार्यरत असून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. डिजिटल वर्ग, विद्यार्थिनींसाठी विशेष योजना तसेच स्थानिक संस्थांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काही मूलभूत सुविधांच्या बाबतीत अजूनही गंभीर त्रुटी असल्याचे चित्र समोर येत आहे.
नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा साधारण ते चांगला मानला जात असला तरी परिसरातील स्वच्छता, शाळांच्या अवतीभवती संरक्षक भिंती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालये आणि क्रीडांगणे यांसारख्या आवश्यक सुविधांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विशेषतः पाचबत्ती चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ संदर्भात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळेच्या विकासासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची चर्चा असताना आजही शाळेला मुख्य प्रवेशद्वार नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कामाचा ठेका पूर्ण होऊन ठेकेदाराला देयके अदा करण्यात आली असतानाही प्रवेशद्वाराचे काम अपूर्ण राहिले आहे. यामुळे शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यपींचा शाळा परिसरात होणारा वावर आणि त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विकासकामांमध्ये पारदर्शकता राखली जात आहे का, निधीचा योग्य वापर होत आहे का, याची चौकशी व्हावी अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे. तथापि, या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
नागरिकांनी लोकनियुक्त आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, शिक्षण विभाग तसेच विरोधी पक्षनेत्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शैक्षणिक क्रांतीची दिशा कायम ठेवायची असेल तर केवळ इमारती उभारून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही वेळेत उपलब्ध करून देणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक २ च्या प्रवेशद्वारासह प्रलंबित सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
– आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments