
साहस Times :- दिव (गुजरात) येथील घोगला बिचवर सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत फलटणच्या चैतन्य अजित शिंदे याने महाराष्ट्रासाठी घवघवीत यश मिळवले आहे. चैतन्यने १० किलोमीटर समुद्र जलतरण प्रकारात अवघ्या २ तास १३ मिनिटांत हे अंतर पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल जिंकले. या कामगिरीमुळे चैतन्यच्या नावाचा झेंडा राज्यभर फडकला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सध्या चैतन्य शिंदे पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे व विशाल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती.
गुजरातच्या दिव समुद्रात २१ मे रोजी पार पडलेल्या या कठीण सागरी स्पर्धेत चैतन्यने जिद्द, संयम व ताकदीचे दर्शन घडवत राज्यासाठी गौरव मिळवला. या यशामागे राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
चैतन्यच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राजे नाईक निंबाळकर तसेच तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







