पंढरपूर : शहरात एक धक्कादायक घटना घडली
असून, 23 वर्षीय युवकाने यमाई तलावात उडी घेत आपले जीवन संपवले. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्याने मित्रांना बोलावून घेतले आणि त्यांना टाटा-बाय-बाय म्हणत थेट तलावात उडी मारली. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ऋतिक शंकर कदम (वय 23) असे आहे. ऋतिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. बुधवारी रात्री तो यमाई तलावाजवळ गेला आणि त्याने आपल्या मित्रांना तिथे बोलावले. मात्र, मित्रांसोबत कोणताही संवाद न साधता, अचानक टाटा-बाय-बाय म्हणत तलावात झेप घेतली.
ही घटना पाहून त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने कुटुंबीयांना व पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही. अखेर आज सकाळी शोधमोहीम सुरू केल्यानंतर ऋतिकचा मृतदेह सापडला.
या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.