कबीररंग: कथनी थोथी जगत में, करनी उत्तम सार…

0
2
कबीररंग:  कथनी थोथी जगत में, करनी उत्तम सार…


हेमकिरण पत्की12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण बोलतो. आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी संबंधित माणसांशी बोलतो. आणखी जवळच्या माणसांशी भावनिक आदानप्रदानाकरिता बोलतो. कधी कौटुंबिक, कधी व्यावसायिक, कधी सामाजिक, तर कधी आपल्या आवडत्या क्षेत्रातील कामकाजासाठी आपल्याला शब्दांतून व्यक्त व्हावं लागतं. शब्दांतून घडणारा हा व्यवहार आवश्यक असतो. पण, कामापुरतं बोलत असतो का आपण? जे बोलत असतो त्यातून अन्य गोष्टी साधल्या जात असतात आणि आपण त्या विषयी सजग असतो का? आपल्या बोलण्यात विचार-विवेक असतो की आपण या ना त्या अनुषंगानं नुसतंच बोलत असतो? हे प्रश्न बोलणं नावाची क्रिया समजून घेताना महत्त्वाचे ठरतात. बोलण्याचं प्रमाण वाढलं की, आपलं जगणं शाब्दिक होऊ लागतं. एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगताना ती सूचित करून आपण थांबत नाही. याचा परिणाम आपल्या मनाची अस्वस्थता वाढण्यात होतो. कबीरांना शब्दांच्या आहारी जाणाऱ्या, त्याचं व्यावहारिक औचित्य न कळणाऱ्या आणि बोलता बोलता आपली कृती विसरून जाणाऱ्या मनांची काळजी वाटते! एवढंच नाही, तर बोलणं आणि वागणं यातल्या विसंगती ते खूप आस्थेनं आपल्यासमोर ठेवतात…

पानी मिलन न आप को,

औरन बकसत छीर।

आपन मन निहचल नहीं

और बंधावत धीर।।

स्वतःला प्यायला पाणी मिळत नाही असा माणूस जेव्हा दुसऱ्याला दूध देण्याविषयी बोलतो, तेव्हा त्याचे शब्द किती पोकळ असतात! स्वतःची तहान जाणू न शकणारा दुसऱ्याच्या तहानेचं निवारण शब्दांतून करू पाहतो, तेव्हा शब्द खोटे असतात. ते निरुपयोगी असतात. कबीर म्हणतात, अशा वृत्तीच्या माणसाचं सगळं वागणं शब्द आणि कृती यांतल्या विसंगतीनं भरलेलं असतं. तो स्वतः मनानं स्थिर नसतो आणि दुसऱ्या कुण्या अस्थिर माणसाला मनाचं संतुलन ठेवण्याचा उपदेश करत राहतो.

एखाद्या प्रसंगाचा आपल्याला अनुभव नसतो, त्यातलं शहाणपण आपल्याजवळ नसतं, तेव्हा कुठल्या अधिकारानं आपण दुसऱ्याला काही शिकवू पाहतो? या सगळ्या विसंगतीनं भरलेल्या बोलण्यातून आपणच आपल्याला फसवत असतो.

कबीरांच्या दृष्टीनं उक्ती-कृतीचा मेळ साधणं ही आध्यात्मिक जगण्याची रीत आहे. ही रीत मनाला सरळ ठेवणारी आहे. सरळ मनच स्वतःला आणि दुसऱ्याला सहजपणे समजून घेऊ शकतं. कबीर म्हणतात…

कथनी बदनी छाडि दे,

करनी सों चित लाय।

नर सो जल प्याये बिना,

कबहु प्यास न जाय।।

आपल्याला वाटत असतं की, एखाद्याला त्याच्या अडचणीत हिताचे दोन शब्द सांगावेत. त्याच्या मनाला आधार वाटेल असा उपदेश करावा. पण, कबीरांना या तळमळीतही सांगणाऱ्याचा अहंकार जाणवतो. ते म्हणतात, जो खरंच गरजवंत असेल, तो कुणाच्याही मानसिक आधाराशिवाय स्वत:च्या तहानेचा शोध घेईलही. खरी तहान असलेला मृगजळाने तृप्त होत नाही. दुसऱ्याला सांगणाऱ्यानं हे जाणून थोडं अलिप्त राहायला काय हरकत आहे?

बोलणं आवश्यक असल्याशिवाय शब्दांचा व्यवहार नको किंवा बोलण्यानं बोलणाऱ्याचा अहंकार वाढत असेल, तरीही बोलणं नको. शब्दांचं अवडंबर माजलेल्या या जगात, त्याचा गैरवापर होत असलेल्या मायावी दुनियेत शाब्दिक सभ्यतेला उगाच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. प्रचितीवीण बोललेल्या शब्दांना समाजात कवडीचेही मोल असत नाही. हे सार हृदयात पोहोचवताना कबीर म्हणतात…

कथनी थोथी जगत में,

करनी उत्तम सार।

कहैं कबीर करनी भली,

उतरै भोजल पार।।

बोल कितीही सात्विक असले, तरी काय उपयोग? आपलं वागणं सत्त्वशील माणसाचं असायला हवं ना! बहुदा असंच असतं. बोलणाऱ्याचे शब्द आश्वासक असतात, प्रभावी असतात, समूहाचा ताबा घेणारे असतात. पण, त्याचं चरित्र जाणू जाता बोलण्या-चालण्यातलं अंतर दृष्टीत उतरतं. आपण असं दोन पातळ्यांवर का जगतो, याचा विचार होत नाही, तशी कृतीही आपल्याकडून होत नाही. कबीर म्हणतात, उक्ती-कृतीत मेळ साधणारा सत्त्वगुणी माणूस असतो. तोच आपल्या सदाचारातून या मायावी जगाचा पैल गाठू शकतो. शाब्दिक संस्काराच्या बंधनातून मुक्त होऊन तो सहजानंदाला प्राप्त होतो.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link