
अकलूज परिषदचे नगरसेवक नाना गलांडे, उद्योजक मोहन तिकोटे व विलास गायकवाड व ओंकार क्षीरसागर आर ओ प्रकल्पाला भेट
अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक नाना गलांडे, अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक मोहन तिकोटे, विलास गायकवाड आणि ओंकार क्षीरसागर यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरओ पाणी प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
अकलूजमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे, नगरसेवक विलास काका क्षीरसागर आणि उद्योजक मोहन तिकोटे यांच्या पुढाकारातून मोफत आरओ पाणी जार वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याला अधिक व्यापक आणि कायमस्वरूपी स्वरूप देण्याच्या दृष्टीने आरओ प्रकल्प उभारण्याबाबतची माहिती घेण्यात आली.
यावेळी कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आरओ प्रकल्पाची उभारणी, कार्यपद्धती, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, आवश्यक यंत्रसामग्री, देखभाल, खर्च आणि नागरिकांना सातत्याने शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली.
यापुढील काळात अकलूजमधील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.










