
अकलूजच्या नगरसेवक नाना गलांडे, मोहन तिकोटे विलास गायकवाड आणि ओंकार क्षीरसागर यांची आरओ पाणी प्रकल्पाची पाहणी
अकलूज | प्रतिनिधी
अकलूज परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार पिण्याचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक नाना गलांडे, अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक मोहन तिकोटे, विलास गायकवाड आणि ओंकार क्षीरसागर यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन तेथील आरओ पाणी प्रकल्पाची पाहणी केली.
अकलूजमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कारखान्यातील अधिकाऱ्यांनी आरओ प्रकल्पाची उभारणी, कार्यपद्धती, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, आवश्यक यंत्रसामग्री, देखभाल, प्रकल्पाचा खर्च तसेच नागरिकांना सातत्याने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली.
या भेटीदरम्यान भविष्यात अकलूजमधील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अशा लोकहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे अकलूजमध्ये भविष्यात आधुनिक आरओ पाणी प्रकल्प उभारणीसाठी सकारात्मक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांमधून या प्रयत्नांचे स्वागत केले जात आहे.










