
आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती गंभीर; इंद्रायणीवरील चारही पूल पाण्याखाली, भाविकांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी :- आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू असतानाच आळंदी येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सध्या आळंदीत प्रवेश करणे धोकादायक ठरत असल्याने भाविकांनी आपला प्रवास पुढे सुरू न करता ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे. तसेच इंद्रायणी नदीपात्र, घाट परिसर आणि प्रशासनाने बंद केलेल्या पुलांजवळ जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.
भाविकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे आणि पुढील अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.










