फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

0
4
फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

फलटण :- फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण
फलटण शहर व तालुक्यातील सहकार आणि बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फलटण येथील The Yashwant Co-operative Bank Ltd. या बँकेचा बँकिंग परवाना अखेर रद्द केला आहे. आरबीआयने दि. १९ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली. आजच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँकेला कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. बँकेकडे आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नसल्याचे तसेच भविष्यात उत्पन्न मिळण्याची कोणतीही ठोस शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांची रक्कम परत करण्यास सक्षम नसल्याचेही आरबीआयने नमूद केले आहे.
तसेच, बँकेने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेषतः कलम ११(१), २२(३) आणि ५६ अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करण्यात बँकेने गंभीर त्रुटी केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बँक पुढे सुरू राहिल्यास ठेवीदारांचे आणि सार्वजनिक हिताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.
परवाना रद्द झाल्यानंतर बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे, विद्यमान ठेवींची परतफेड करणे किंवा इतर कोणताही बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, बँकेची अवसायन प्रक्रिया (Winding Up) सुरू करण्यासाठी सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र यांच्याकडे अवसायक (Liquidator) नेमण्याची विनंतीही आरबीआयकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ’ (DICGC) अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार तब्बल ९९.०२ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC मार्फत परत मिळण्यास पात्रता आहे.
विशेष म्हणजे, २० एप्रिल २०२६ पर्यंत DICGC कडून संबंधित ठेवीदारांना सुमारे १०६.९६ कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आले असल्याची माहिती आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
या घडामोडीमुळे फलटण शहर आणि तालुक्यातील सहकार क्षेत्र, ठेवीदार, कर्जदार आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.