
फलटण | प्रतिनिधी. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रजिस्ट्स’ (AIOCD) यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्या दिवशी बहुतांश औषध दुकाने बंद राहणार आहेत.
या आंदोलनाला ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रजिस्ट्स असोसिएशन’ (MSCDA) तसेच ‘सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रजिस्ट असोसिएशन’ यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची रणनीती आखण्यात आली असून, अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल आणि अनिल नावंदर यांनी सर्व औषध विक्रेत्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्या काय?
संघटनेकडून केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
ई-फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्री तातडीने बंद करण्यात यावी.
औषध विक्री संदर्भातील GSR 817 (दि. २८ ऑगस्ट २०१८) निर्णय मागे घ्यावा.
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलतींवर बंदी आणावी.
बनावट औषधांचा धोका टाळण्यासाठी कोविड काळातील GSR 220 (दि. २६ मार्च २०२०) निर्णय रद्द करावा.
संघटनांच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून ग्रामीण भागातील छोटे औषध विक्रेते आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
फलटणमध्ये केमिस्ट संघटनेची बैठक
संपाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासदांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशनचे सदस्य राहुल मोहिते, फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम धुमाळ आणि उपाध्यक्ष रणजीत कदम उपस्थित होते. त्यांनी सर्व सदस्यांना बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था
संपादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनने विशेष खबरदारी घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तालुक्यात दोन औषध दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष संग्राम धुमाळ म्हणाले,
“ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्रामीण भागातील औषध दुकानदारांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. हा लढा आमच्या हक्कांसाठी असला तरी जनतेची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”







