Tuesday, August 11, 2026
Homeफलटणकालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

कालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

कालकथित नितीन भालेराव यांना धम्ममय पुण्यानुमोदनातून आदरांजली

फलटण : कालकथित नितीन बाबासो भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुण्यानुमोदन कार्यक्रमात बुद्ध धम्माच्या संस्कार विधीनुसार धम्ममय वातावरणात विधी पार पडला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य महावीर भालेराव यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी नितीन भालेराव यांच्या जीवनकार्याची आठवण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “जीवनात चांगल्या मित्रांची साथ मिळणे महत्त्वाचे आहे. वाईट संगती सोडून चांगल्या विचारांचा स्वीकार केला पाहिजे. नितीन यांनी अनेक चांगली कार्ये केली आणि समाजात सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला. आज ते आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार कायम स्मरणात राहतील. आर्यन आणि गुड्डी यांना सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात अनंत राऊत यांची ‘मित्र’ ही कविता सादर केली. त्यांच्या भावस्पर्शी कवितेमुळे उपस्थितांचे वातावरण भावुक झाले. “मित्र असा असावा जो संकटात मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल,” असा संदेश त्यांनी दिला.

आयु. संदीप भालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नितीन हे सर्वांशी मैत्रीपूर्ण व आदराने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. मदतीस तत्पर असलेला माणूस चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. तथागत बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग दिला असून व्यसनातून बाहेर पडण्यासाठी संवाद, समजूत आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. माया जरूर करा, पण चुकीवर पांघरूण घालू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आयु. किरण गायकवाड म्हणाले, “गेलेली व्यक्ती परत येणार नाही, मात्र समाजाने यातून बोध घेतला पाहिजे. भीमनगरातून दारूबंदीची सुरुवात व्हावी. समाज त्यांच्या आठवणी कायम जपेल,” असे सांगत त्यांनी जयंती मंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण केली.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “नितीन माझ्या अत्यंत जवळचे होते. व्यसनाच्या आहारी गेले असले तरी त्यांनी अनेक चांगली कामे केली. ‘धम्माचे कार्य सुरू ठेवा’ माझ्या बंधुला साथ द्या. हा त्यांचा कायम आग्रह असायचा. व्यसनमुक्तीसाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून आणि समाजापासून सुरुवात केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुका माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी पंचशील पालनाचे महत्त्व अधोरेखित केले. “लहान मुलांवर योग्य संस्कार आणि लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दुःखावर व्यसन हा उपाय नसून पंचशील आणि धम्माचा मार्गच खरा आधार आहे. समाज दुःखाच्या खाईत जात असताना सर्वांनी एकत्र येऊन व्यसनाला मूठमाती देण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या लहान मुलांवर पहिल्यापासून लक्ष ठेवा. तो कुठे जातोय, काय करतोय हे पाहिले पाहिजे. तेव्हाच मुले व्यसनापासून दूर राहणार आहेत. दुःखाला व्यसन हा पर्याय नाही. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करा.” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थितांनी कालकथित नितीन भालेराव यांना एक मिनिट उभे राहून आदरांजली अर्पण करत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments