
फलटण : माघ पौर्णिमेच्या पावन पर्वाच्या निमित्ताने बुद्ध फुले शाहू आंबेडकर सभागृह, कोळकी येथे महिला संस्कार वर्गाच्या वतीने धम्मकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाला गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने भंते काश्यपजी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महिलांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला. भंते काश्यपजी प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या शिकवणीचा प्रभाव संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आला.
माघ पौर्णिमा हा दिवस बुद्ध, धम्म आणि संघ यांचे महत्त्व अधोरेखित करणारा असून संघाची एकता, शिस्त आणि धम्माचरणाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने सूत्रपठन व धम्मविचारांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपासिका रजनी माने व त्यांच्या परिवाराच्या वतीने खीरदान करण्यात आले. यावेळी बोलताना रजनी माने म्हणाल्या, “माघ पौर्णिमा हा केवळ धार्मिक विधीचा दिवस नसून, बुद्धांनी दिलेल्या करुणा, प्रज्ञा आणि शील या मूल्यांचे आचरण करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.”
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्राताई गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, बौद्ध धम्मातील प्रत्येक पौर्णिमा ही पवित्र मानली गेली आहे. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळा आहे. माघ पौर्णिमा ही फक्त भारतातच नव्हे तर जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धाने वैशाली नगरीचा अंतिम निरोप घेतला. याच पौर्णिमेला भिक्षु आनंद यांचे परिनिर्वाण झाले. याच पौर्णिमे दिवशी तथागतांनी सारीपुत्त व महा मोग्लान संघाचे संघप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत आनंदात आपण दरवर्षी साजरी करूया. “
या कार्यक्रमास उपासिका प्रियांका भोसले, अंकिता भोसले, अभिलाषा भोसले, दुर्गा भोसले यांच्यासह वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा गायकवाड, विद्या खंदारे, आरती पाटील, किर्ती माने, अक्षदा लोंढे आदी महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम शांतता, शिस्त व धम्मभावनेच्या वातावरणात संपन्न झाला.








