Tuesday, August 11, 2026
Homeसाताराअनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – माघ पौर्णिमा उत्सवात आयु....

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – माघ पौर्णिमा उत्सवात आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे सखोल धम्म विवेचन

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – सोमीनाथ घोरपडे

साहस Times :- आकुर्डी प्राधिकरण, पुणे येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे तक्षशिला मित्र संघ यांच्या वतीने माघ पौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण व धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष धम्म प्रवचनात भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी भगवान बुद्धांच्या धम्मातील मूलभूत त्रिसूत्री – अनित्य, अनात्म आणि दुःख यावर सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयु. निर्मला वालकर (अध्यक्ष, तक्षशिला मित्र संघ, आकुर्डी प्राधिकरण, निगडी) या होत्या. कार्यक्रमास संघाचे सचिव बौद्धाचार्य सुनील तायडे, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, खजिनदार गुणवंत रामटेके, सल्लागार हिरामण रामटेके, उपकार्याध्यक्ष रंजना निमगडे, ऑडिटर संजय सावंत, कार्यकारणी सदस्य भरत बिऱ्हाडे, उपसचिव सुनील तायडे यांच्यासह अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव, मुक्त पत्रकार, लेखक आयु. सोमीनाथ घोरपडे, यांनी “दुःख, अनित्य आणि अनात्म” या विषयावर सखोल धम्म प्रवचन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेली धम्माची मूलभूत त्रिसूत्री – अनिच्च (अनित्य), दुक्ख (दुःख) आणि अनत्ता (अनात्म) ही संकल्पना पाली धम्मपरंपरेनुसार स्पष्ट केली.

ते म्हणाले, “सब्बे संखारा अनिच्चा” (धम्मपद – अनिच्च वग्ग) अर्थात सर्व संस्कार नाशवंत आहेत. जगातील कोणतीही गोष्ट स्थिर नाही. या अनित्यतेचे यथार्थ ज्ञान झाले की आसक्ती कमी होते. पुढे “सब्बे संखारा दुक्खा” (धम्मपद – दुक्ख वग्ग) या सूत्राचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अज्ञानातून निर्माण होणारी तृष्णा हीच दुःखाचे मूळ आहे. जन्म, जरा, व्याधी व मरण हे दुःखाचे स्वरूप आहे.
तसेच “सब्बे धम्मा अनत्ता” (धम्मपद – अनत्ता वग्ग) या पाली सूत्राचा उल्लेख करत त्यांनी आत्मा, परमेश्वर वा शाश्वत सत्ता नसल्याचा बुद्धांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्पष्ट केला.

“मी” आणि “माझे” या कल्पनाच दुःख वाढवतात असे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी त्यांनी चार आर्य सत्य – दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य – यांचे सोप्या व ओघवत्या भाषेत विश्लेषण केले. तसेच आर्य अष्टांग मार्ग – सम्यक दृष्टि, संकल्प, वाचा, कर्मांत, आजीविका, प्रयास, स्मृती व समाधी – हा मानवमुक्तीचा शास्त्रीय मार्ग असल्याचे प्रतिपादन केले.
ते म्हणाले, “भगवान बुद्धांचा धम्म हा अंधश्रद्धेवर नव्हे तर अनुभव, विवेक आणि विज्ञानावर आधारित आहे. जिथे विज्ञान संपते, तिथे बुद्धाचा धम्म सुरू होतो.”

प्रवचनाच्या शेवटी आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे “मुक्तिदाता” हे पुस्तक उपस्थित उपासक-उपासिकांना भेट दिले व बुद्धधम्माच्या मानवकेंद्री विचारधारेचा प्रसार करण्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारप्रवर्तक प्रवचनामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले असून उपस्थितांनी बुद्धधम्माच्या मार्गाने आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आयु. एल. एन. निकाळजे (माजी सैनिक, माजी समता सैनिक दल प्रमुख ऑफिसर, प्रबोधनकार गायक, फलटण) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचळवळीतील योगदानावर प्रकाश टाकत दोन भीमगीतांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच तक्षशिला मित्र संघ, आकुर्डी प्राधिकरण, निगडी यांच्या अध्यक्ष आयु. निर्मला वालकर यांनी माघ पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील ऐतिहासिक महत्त्व विशद करत भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा व मैत्रीच्या मार्गाने आचरण करण्याचे आवाहन केले आणि धम्मचळवळ अधिक गतिमान करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी आयु. संग्राम निकाळजे व आयु. नितिन बनसोडे या दोन कुटुंबांच्या वतीने खीरदान व फलाहाराचे आयोजन करण्यात आले. दोन्ही कुटुंबातील प्रमुखांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments