Satara Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील माण तालुक्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळं अनेक गावचे संपर्क तुटले आहेत.
पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
दरम्यान, मुसळधार पावसामुळं दहिवडी-फलटण रस्ता, शिंगणापूर- फलटण रस्ता, आंधळी-मलवडी रस्ता, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. दिवसभर शिंगणापूर तसेच परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे, नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिलेत. तर ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
फलटण तालुक्यात 24 तासात 251 मिलिमीटर पावसाची नोंद, फळांच्या गावात रेकॉर्ड ब्रेक पाऊस
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फळांचे गाव धुमाळवाडी पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या 24 तासात 251 मिलिमीटर पावसाची नोंद फलटण तालुक्यामध्ये झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात असणारा फलटण तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडल्याने संपूर्ण शेती ओढे नदी नाले दुधडी भरुन वाहत आहेत. यातच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50 हून अधिक गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा असणारा पाझर तलाव गेल्या 30 वर्षाच्या काळात प्रथमच असा ओव्हर फ्लो भरुन वाहत आहे.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस
दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन
महाराष्ट्रात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
अधिक पाहा..