अकलूज/प्रतिनिधी: तांबवे (ता. माळशिरस) येथील ग्रामसेवक व लिपिक यांनी गावातील विविध कामांमध्ये संगणमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत दिव्यांग क्रांती लोकसेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने जोरदार आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून, येत्या पंधरा दिवसात दोषींवर कारवाई केली जाईल, असे विस्तार अधिकारी कोळी यांनी स्पष्ट केले आहे. या लेखी आश्वासनानंतर सदर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भोसले यांनी दिली.
संघटनेच्या वतीने तांबवे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास दुसऱ्या दिवशी पंचायत समिती माळशिरसचे विस्तार अधिकारी कोळी यांनी भेट देऊन चर्चा केली आणि कारवाईचे लेखी आश्वासन दिले. मात्र, जर पंधरा दिवसात कारवाई झाली नाही, तर गटविकास अधिकारी कार्यालय माळशिरस समोर आक्रमक आंदोलन छेडले जाईल आणि त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सत्यवान भोसले यांनी दिला आहे.