Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रएन. रघुरामन यांचा कॉलम: एक जीव वाचवणे संपूर्ण मानवता वाचवण्यासारखे

एन. रघुरामन यांचा कॉलम: एक जीव वाचवणे संपूर्ण मानवता वाचवण्यासारखे

[ad_1]

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या रविवारी तो कबाब खात होता तेव्हाच गोळीबाराचा आवाज ऐकून लोक इकडे-तिकडे धावू लागले. तो कबाब तिथेच सोडून गोळ्यांच्या दिशेने धावला. ऑस्ट्रेलियातील बाँडी शूटिंगची घटना भयावह होती, परंतु या घटनेने सामान्य लोकांचे शौर्यही दाखवून दिले. यामध्ये एक होते पंजाबी-शीख, भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक अमनदीपसिंह बोला. त्यांनी पोलिसांच्या गोळीने जखमी झालेल्या एका शूटरला अडखळताना पाहिले आणि ते त्याच्यावर तुटून पडले. ऑस्ट्रेलियात पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या बोला यांनी हल्लेखोर साजिद अकरमची बंदूक लाथ मारून दूर फेकली. त्याला जमिनीवर दाबून धरले आणि हातांनी घट्ट पकडले, जेणेकरून तो दुसरे कोणतेही शस्त्र वापरू शकणार नाही. ३४ वर्षांचे बोला हे केवळ एक पादचारी होते. ते गोळीबाराच्या ठिकाणापासून बरेच दूर होते, तरीही ते तिथे गेले जिथे अज्ञात हल्लेखोर गोळ्या झाडत होते आणि जे काही करता येईल ते त्यांनी केले.

या ठिकाणापासून दूर, केवळ एक दिवसापूर्वी शनिवारी आणखी एका ३४ वर्षीय भारतीयाला वाचवणारे कुणीही नव्हते. विशेष म्हणजे, त्यांनी रस्त्यावर गाडी सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक लोकांची मदत केली होती. पेशाने मेकॅनिक असलेल्या या व्यक्तीच्या छातीत रात्री ३.३० वाजता तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांची पत्नी रूपा यांनी वेळ न घालवता त्यांना स्कूटरवरून जवळच्या रुग्णालयात नेले. तातडीने उपचार मिळतील अशी आशा होती, पण मदत मिळाली नाही. कोणताही डॉक्टर उपलब्ध नाही, असे सांगून त्यांना रुग्णालयातून परत पाठवण्यात आले. जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात ईसीजी केला असता त्यांची सर्वात मोठी भीती खरी ठरली- तिचे पती व्यंकटरमण यांच्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे होती. पुन्हा एकदा, ना कोणते आपत्कालीन उपचार मिळाले, ना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. त्यांना फक्त तिसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. घबराट वाढत होती, कोणतीही मदत दिसत नव्हती, अशा वेळी त्यांनी जे शक्य होते तेच केले. ते पुन्हा स्कूटरवर बसले आणि पुढच्या रुग्णालयाकडे निघाले. साधारण ४.२१ वाजता व्यंकटरमण यांनी पुन्हा छाती धरली. स्कूटर डगमगली आणि दोघेही रस्त्यावर पडले. दोघेही जखमी झाले. घाबरलेली रूपा सावरून पतीकडे धावली, जे श्वास घेण्यासाठी धडपडत होते. त्यानंतर त्या रात्रीचा कदाचित सर्वात क्रूर क्षण आला. रूपा हात हलवत, गयावया करत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांकडे थांबण्याची भीक मागत होती, जेणेकरून कुणीतरी थांबेल आणि तिच्या पतीला रुग्णालयात पोहोचवेल. पण एकामागून एक वाहने जात राहिली आणि कुणीही मदतीसाठी थांबले नाही. रस्त्यावर पडलेले व्यंकटरमण एकेका श्वासासाठी झुंज देत होते. एकेक मौल्यवान क्षण निघून जात होता. अखेर एक पादचारी त्यांच्याजवळ थांबला. लवकरच व्यंकटरमण यांची बहीणही तिथे पोहोचली आणि गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी सात मिनिटांनंतर एक कार थांबली. तोपर्यंत व्यंकटरमण बेशुद्ध झाले होते. बहिणीने सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, पण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशी निर्दयी घटना कुठे घडू शकते, असा विचार तुम्ही करत असाल? तर हे बंगळुरूमध्ये घडले. आपल्या देशातील लोक ऑस्ट्रेलियासारख्या दूरच्या देशात जीव वाचवू शकतात, पण डोळ्यांसमोर तडफडणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचवू शकले नाहीत. अशी घटना घडू शकते यावर तुमचा विश्वास बसत नाहीये? दुर्दैवाने हे सर्व- रूपाने केलेली मदतीची याचना, रस्त्यावर पडलेले तिचे पती आणि पादचाऱ्यांची अनास्था – जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ट्रॅफिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. व्यंकटरमण यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. नक्कीच, कुणाचे प्राण वाचवणे हे मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान मानले जाते. हे काम कधी तातडीने दाखवलेल्या शौर्यामुळे, कधी गरजवंताला वैद्यकीय सेवा दिल्यामुळे तर कधी परोपकारासारख्या कामांमुळे पूर्ण होते.

तुमच्या मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments