Maharashtra Unseasonal Rain: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यासह विदर्भातील बुलढाणा (Buldhana) आणि वाशिम (Washim) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
Satara Unseasonal Rain: साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळाचा तडाखा
साताऱ्यातील पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कामरगाव, नेचर आणि गोकुळ हेळवाक या गावांना बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, ज्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्य भिजले आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम असल्याने कामरगाव आणि नेचर येथील लग्न मंडप पूर्णतः उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळींची मोठी धांदल उडाली. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू केले आहेत. दरम्यान, या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला कोयना परिसरातील ओझर्डे धबधबा प्रवाहित झाला आहे. भर उन्हाळ्यात हा धबधबा वाहण्याची ही पहिलीच वेळ असून पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
Buldhana Unseasonal Rain: बुलढाण्यात मध्यरात्रीनंतर पावसाची बॅटिंग
बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार आणि मेहकर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. लोणार तालुक्यात तर आज सकाळी 6 वाजेनंतरही पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना रणरणत्या उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Washim Unseasonal Rain: वाशिममध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस
वाशिम जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सातत्याने होत असलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असली तरी, उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Hingoli Unseasonal Rain: हिंगोलीत अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात काल दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यासह हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात वाळत घातलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कांदा बीज, भुईमूग तसेच आंब्याच्या बागांनाही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सरकळी येथील शेतकरी संभाजी पवार यांच्या एक एकर क्षेत्रावरील हळदीचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. हळद काढणी करून शेतात वाळत घातली होती. मात्र अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे हळद झाकण्यासाठीही शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही. तसेच जी हळद ताडपत्रीने झाकून ठेवली होती, त्या ताडपत्रीवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा






