- Marathi News
- Opinion
- Balraj Sanghai Column Balanced Development Indian Culture Values | Balraj Sanghai
बलराज संघई7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उत्क्रांती आणि विकास होणे हा सृष्टीचा नियम आहे. काळ अनुरूप तो होतच राहणार. विकास हा संतुलित हवा. असंतुलित विकास हा विनाशाचे कारण बनतो. कपडे बदलले म्हणून संस्कार बदलत नसतात, संस्कार बदलू नयेत, विसरू नये.
सृष्टीमध्ये उत्क्रांती होत गेली, अनेक जीव जातींचा विकास झाला, परंतु विज्ञानाला हे पकडता आले नाही की आत्मिक विकास देखील होत गेला. त्यातच संस्कृती सुरक्षित असते.
हजारो वर्षांपूर्वी ज्या घरट्यात चिमणी राहत होती त्याच घरट्यात आज ही राहते. पशुपक्षी प्राण्यांचे जसे रंग रूप होते ते तसेच आहे. सूर्य पूर्वेला उगवत होता आजही पूर्वेला च उगवतो व पश्चिमेलाच मावळतो. फरक माणसात पडला. माणसाने विकासाचा वेगळा अर्थ घेतला. मग कला असो ,साहित्य असो, फिल्म इंडस्ट्री असो, कारखाने असो सर्वांचे स्वरूप बदलणार यात वाद नाही, बदल हे जीवंतपणाचे लक्षण असते. परंतु मूळ आत्मस्वरूपात बदल नको. हाच संस्कार अपेक्षित आहे. चार ठिकाणचे संस्कार गेले म्हणून जगातून संस्कार नष्ट झाले असे नव्हे. रुचिपालटावर आपले नियंत्रण असायला हवे. आणि हे काम साहित्याचे, सामाजिक आणि धार्मिक नायकांचे आहे. साहित्य समाजाला वळण देते. तसेच साहित्य निर्माण व्हावे. नवीन नृत्याचे विचित्र प्रकार आले. तरी स्पर्धेमध्ये लावणी सादर होतेच ना तितक्याच नजाकतीने. लोककलेचा ऱ्हास व्हायला नको. तसेच कलेच्या मूळ स्वरूपातही बदल नको.
म्हणूनच विकास व्हावा परंतु तो संतुलित पद्धतीने. आज जगाच्या सोबत चालत असताना भौतिक विकासात आपला देश आणि आपण मागे राहता कामा नये. वैज्ञानिक विकास परम सीमेवर असताना त्यात आपलाही सहभाग असावा ही काळाची गरज आहे, ज्ञानवंतांची मोठी पिढी बाहेर देशात कामासाठी आणि उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणावर जाताना दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारतीय संशोधकांचे मोठे प्रमाण आहे. हा ज्ञानवंतांचा विज्ञानवंतांचा बाहेर जाणारा लोंढा थांबवला आला तर हाच विकास त्यांच्या माध्यमातून आपल्या देशात होईल.
एक पिढी बाहेर जाऊन परत आपल्या देशात येते त्यावेळेस त्यांच्यामध्ये थोडासा बदल घडून आलेला असतो आणि त्यांच्या पुढची पिढीही त्या रंग रूपाची , त्या आवडी-निवडीची बनलेली असते. असाच पूर्वेकडील आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा ऱ्हास होऊन त्यामध्ये हे सांस्कृतिक प्रदूषण होत आहे. म्हणूनच ज्या काही प्रमाणात आपल्याकडे विकास होत आहे त्याच प्रमाणात सांस्कृतिक संतुलन थोडेसे कमी झाले आहे की काय असे वाटते आणि आपलेही राहणीमानात, विचारात, वागण्यात पाश्चिमात्यकरण अधिकाधिक प्रमाणात होत असल्यासची मोठी भीती आहे आणि तसे प्रत्यक्ष दिसत आहे.
कोणत्याही समस्येवर घाबरून जाऊन माघार घेतल्यापेक्षा त्याचा संघर्ष केला पाहिजे आणि त्याचे उपाय शोधून त्याप्रमाणे निराकरण केले पाहिजे. विकासही झाला पाहिजे, आपण जगाच्या मागे राहू नये परंतु आपली संस्कृती ही आपल्याला जपायची आहे.आपल्यात असलेला परस्पर आदर आपले संस्कार, आपली जीवनशैली, म्हणजेच आपली भारतीय संस्कृती सांभाळून आपल्याला हे सर्व करायचे आहे. यासाठीच तर आपण आपली पिढी या दृष्टीने घडवली पाहिजे. ही आपल्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. म्हणूनच धार्मिक, सांस्कृतिक शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे शैक्षणिक प्रक्रियेमध्ये, धोरणामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव होतो आहे की नाही हे प्रत्येक भारतीयांनी तपासण्याचे कर्तव्य आहे.
पूर्वीच्या आणि आजच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये खूप फरक पडला. आज आपला स्वर्णीम इतिहास आणि जगामध्ये असलेली अद्वितीय अशी भारतीय संस्कृती ही किती प्रमाणामध्ये शालेय अभ्यासक्रमामधून प्रत्यक्ष दिसते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीच्या मूल्यावर आधारित शिक्षणाचा अंतर्भाव शैक्षणिक अभ्यासक्रमात असायलाच हवा. त्यासोबतच आपण स्वतः आपल्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीवर आपला धर्म आणि आपल्या संस्कृतीनुसार संस्कार होत आहेत का नाहीत किंवा ते केले पाहिजेत आणि ते आपणच करायचे आहेत. ते आपलेच कर्तव्य आहे हे समजून केले पाहिजे.
अजूनही काही भारतीय समाजामध्ये पुढच्या पिढीला लहान मुलांना धार्मिक शिक्षणाला पाठवले जाते, धार्मिक शिक्षणाची व्यवस्था असते त्यामध्ये संस्कृती जपल्या जाते आणि संस्कार होतातही परंतु हे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यातच पुढे भौतिकतेशी लढताना स्पर्धेच्या युगात जगताना या गोष्टींचा विसर पडतो. हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी लेखाद्वारे असा आग्रह आहे की विकास व्हावा, आपण जगाच्या मागे नसावे. तांत्रिक विकास व्हावा, तंत्रज्ञान विज्ञान वैद्यकीय सर्व क्षेत्रांमध्ये आपण पुढे गेले पाहिजे.
आपल्या प्रतिभेचा, विज्ञानवंतांचा, ज्ञानवंतांचा आपल्याच देशाला उपयोग व्हावा अशी ही योजना कशी अमलात आणली जाईल हा एक विचार व्हावा आणि या विकासासोबत संस्कृतीला न विसरता संस्कृतीचा हात धरून पुढे गेले पाहिजे म्हणूनच हे प्रकर्षाने प्रभावाने येथे मांडायचे आहे की विकास व्हावा परंतु तो संतुलित.
(संपर्क- 9420015108)










