शरद पवारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना शशिकांत शिंदेंचा पूर्णविराम

0
2
शरद पवारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना शशिकांत शिंदेंचा पूर्णविराम

शरद पवारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना शशिकांत शिंदेंचा पूर्णविराम

मुंबई | प्रतिनिधी :कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात आयोजित उच्चाधिकार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज विधानभवनात उपस्थित होते. बैठकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचे स्वागत केले.

या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक

बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात आज विधानभवनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीपूर्वी आणि त्यानंतर विधानभवन परिसरात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी गर्दी केली होती.

अतिवृष्टी आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, बैठक संपल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार उपस्थित होते. सर्वांना भेटून संवाद साधण्याच्या उद्देशाने शरद पवार तेथे थांबले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन जवळ असल्याने तेथेही त्यांनी भेट दिली. या चर्चेत राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळले

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत तसेच एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, अशा कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. पक्ष विलीनीकरण अथवा राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला.