
अकलूज | प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अकलूजसह नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन अकलूज नगर परिषदेने केले आहे.
अकलूज नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारचे धाडस टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरणे, पोहण्याचा प्रयत्न करणे किंवा पूरस्थिती पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांना नदीकाठी खेळण्यासाठी जाऊ देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
नदीकाठच्या शेतकरी व पशुपालकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत व नदीपात्रापासून दूर ठेवावीत, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे आणि उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले की, “वीर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अकलूज नगर परिषद परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी.”
मुख्याधिकारी सचिन पाटील यांनीही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुढील काही दिवस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.









