सातारा, दि. 27: जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली. या बैठकीत शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राज्यभरात 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
यामध्ये जावली 2,579, कराड 6,541, खंडाळा 1,833, खटाव 4,598, कोरेगाव 4,146, महाबळेश्वर 1,118, माण 3,254, पाटण 9,279, फलटण 3,928, सातारा 5,956 आणि वाई 2,190 अशा घरकुलांचे नियोजन करण्यात आले आहे.
गृह निर्माणासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांचा समावेश असून, यासाठी ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग यांच्या समन्वयातून अंदाजे 1,58,730 रुपये प्रति घरकुल देण्यात येणार आहेत. प्राप्त उद्दिष्टांनुसार तातडीने मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरीत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले की, “लाभार्थ्यांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि गैरप्रकार टाळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयांमध्ये आवश्यक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” तसेच, पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना 500 चौ. फुटांपर्यंतच्या घरकुलासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
या बैठकीस खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील आदी उपस्थित होते.