
IAS पुजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला असून, निकालादरम्यानचं निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी
Source link

IAS पुजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला असून, निकालादरम्यानचं निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी
Source link

फलटण: “नीरा-देवघर धरणासाठी आम्ही मेहनत घेतली, पाणी अडवले, आणि आता कालव्याचे काम सुरू झाल्यावर काही जण श्रेय घेऊ पाहत आहेत. साधं गणित आहे—धरणच नसतं तर कालवा कसा झाला असता?” असा रोखठोक सवाल उपस्थित करत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
श्रीराम कारखान्याच्या अस्तित्वाला धोका
जाधव वस्ती, राजाळे (ता. फलटण) येथे जाधव कुटुंबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार दीपक चव्हाण, माजी सरपंच संभाजी निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन सुखदेव बेलदार पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव बुरुंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
“आपलं पाणी कमी करून हे सांगोल्याला पाणी देऊ पाहत आहेत. जर हे घडलं, तर ३६ गावांचं पाणी कमी होईल आणि उसाच्या उत्पादनावर परिणाम होऊन साखर कारखान्यांवर संकट येईल,” असा इशारा रामराजे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना बंद करण्याचा डाव?
“श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद करून, शेतकऱ्यांच्या उसावर डोळा ठेवणाऱ्यांचा हा साधा हिशोब आहे. विरोधकांच्या खाजगी कारखान्यांना फायदा व्हावा म्हणून श्रीराम कारखाना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शेतकऱ्यांनी सावध राहावं, आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही,” असे रामराजे ठामपणे म्हणाले.
“उपळव्याच्या कारखान्यावरही लक्ष ठेवणार!”
“जे श्रीराम कारखान्याविरोधात बोलतात, त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या अनेक कारवाया माझ्या लक्षात आहेत. श्रीरामच्या निवडणुकीत त्यांनी समोर यावं, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
याच दरम्यान, ऊस बिलाबाबत भाष्य करताना ते म्हणाले, “उपळव्याच्या कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले का? स्वतःचा खाजगी कारखाना वेळेवर चालवता येत नाही आणि श्रीराममध्ये लक्ष घालायचं? जर तुम्ही श्रीराममध्ये लक्ष घालाल, तर मग मी उपळव्याच्या कारखान्यात लक्ष घालेन!”
“वादळ जवळ आलंय, सावध राहा!”
“आतापर्यंत फुटीरता दाखवली जात होती, पण आता आम्हाकडे कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू आहे. हे वादळापूर्वीचं शांत वातावरण होतं, आता वादळ जवळ आलंय!” असा स्पष्ट इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

सातारा: लाचखोरी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणाऱ्या साताऱ्याच्या सत्र न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) तपासात त्यांचा सहभाग असल्याचे हायकोर्टाने मान्य केले आहे.
सातारा सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांनी एका प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे (ACB) तक्रार केल्यानंतर, पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने सापळा रचून साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये न्यायाधीशांना रंगेहात पकडले.
या घटनेनंतर, न्यायाधीश निकम यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, लाचखोरी प्रकरणात पुरावे स्पष्ट असल्याने हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे निकम यांना मोठा दणका बसला आहे.
या प्रकरणात न्यायाधीशांना लाच स्वीकारण्यास मदत करणाऱ्या तीन इतर आरोपींचाही समावेश असून, त्यापैकी एक पोलीस अधिकारी किशोर खरात असल्याचे उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
धनंजय निकम यांच्यासह चौघांचा जामीन अर्ज आधीच सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता, आणि आता हायकोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही.
हा प्रकार न्यायालयाच्या आवारातच घडल्याने न्यायसंस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. न्यायाधीशासारख्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीवर लाचखोरीचे आरोप सिद्ध होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.

🔹 जानाई-शिरसाई योजनेसाठी 438 कोटींचा निधी मंजूर, आता निरा-कहा योजनेसाठी तयारी सुरू
🔹 बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील जिरायत भागाची ‘जिरायत’ ही ओळख कायमस्वरूपी बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे 14,080 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.
यानंतर आता निरा-कहा उपसा सिंचन योजनेच्या कामालाही गती देण्यात येत असून, या प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या संदर्भातील 29.64 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यातून सर्वेक्षण आणि इतर प्रक्रियांना वेग दिला जाणार आहे.
निरा-कहा योजनेमुळे मोरगावपासून अंजनगावपर्यंतच्या परिसरातील गावांना पाणी उपलब्ध होईल, ज्यामुळे जिरायत भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी संपुष्टात येईल. अजित पवारांनी दिलेल्या वचनानुसार पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

गांधार शिल्पकलेचा प्रभाव असलेली सम्यक संबुध्द यांचे शिल्प…!
ग्रेट गांधार प्रदेश म्हणुन ओळखले जाणारे प्राचीन काळातील ठिकाण जे प्रामुख्याने आताच्या वायव्य पाकिस्तान आणि पूर्व अफगाणिस्तानात स्थित होते , याच प्रदेशातून सम्यक संबुध्द यांचे पहिले शिल्प निर्माण करण्यात आले होते, सम्यक संबुध्द व कल्पीलेले बोध्दीसत्व यांना साकारण्याचा पहिलाच प्रयत्न या भूभागावरुन झाला, साल होते इ सन पहिले शतक, या भूभागावर राज्य करणारे तत्कालीन कुषाण राज घराण्यातील दुसरे शासक देवपुत्र कनिष्क यांनी ते करून घेतले होते.
इ सनाच्या ७८ मध्ये महासांघीकांची पहिली धम्म संगीती भरवण्यात आली होती, कुषाण राजे कनिष्क यांच्या राजाश्रयाखाली हे आयोजन करण्यात आले होते. संगीतीचे अध्यक्षपद वसुमित्त-वसुमित्र यांनी भूषवले आणि अश्वघोष हे त्यांचे उपाध्यक्ष होते, याच धम्म संगीतीमध्ये सम्यक संबुध्द यांची मानवीय कायेतील सुवर्ण मूर्ती साकारली गेली होती तसेच सुवर्ण नाणे देखील पाडण्यात आले होते , ज्याच्या एका बाजूस स्वतः कनिष्क राजे हे होते तर दुसर्या बाजूस स्थानक स्वरुपातील उजवा हात आशिर्वाद मुद्रेत व डाव्या हाताने चिवराचा काठ धरलेले सम्यक संबुध्द यांचे रुप होते व “बुद्ध” ही अक्षरे अंकित केली गेली होती.
इ स च्या पहिल्या शतकापासून बुद्ध व बोध्दीसत्व यांच्या शिल्पांचा जोरदार प्रचार झाल्याचे दिसून येतो व जनमानसास ते आकृष्ट करु लागले होते याचे संकेत देखील आपल्याला सापडतात, महासांघीकांच्या मान्यता प्राचीन पश्चिम भारतातून बौध्द शिल्पकलेतून दिसायला सुरुवात होते ती इ सन च्या साधारण चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात, सह्याद्रीमधील लेण्यांमधील शिल्पकलेचे सुक्ष्म निरीक्षणातून ही बाब लक्षात येते.
वर्तमानातील नाशिक इथल्या त्रिणहु पर्वतावरील “त्रिरश्मी” लेणी समूहातील लेणी क्रमांक २३ मधील स्थापत्यातील बदलाव सहज लक्षात येतात.
त्रिरश्मी लेणी क्रमांक २३ च्या समोरील भिंतीवरील खोबणीतुन छत्र धारण केलेली सम्यक संबुध्द यांची गांधार शिल्पकलेचा प्रभाव असलेली अर्ध उठावातील शिल्प साकारले गेले आहे, सम्यक संबुध्द यांच्या खंडित चेहर्यावरील स्थितप्रज्ञतेचे भाव आजही या शिल्पावर कायम राहील आहेत, उजवा हात खाली सोडलेला असून चिवराच्या एका टोकाला धरलेला डावा हात जाणीवपूर्वक खंडित करण्यात आला आहे मात्र चिवराला पडलेल्या घड्या ठळकपणे दिसून येत आहेत.
सर्रासपणे सम्यक संबुध्द यांच्या चेहर्याच्या मागील बाजूस असणारे प्रभावलय इथे दिसून येत नाही तर सम्यक संबुध्द यांच्या डोक्यावरील छत्रावली उत्कृष्टपणे कोरण्यात आली आहे, छत्रावलीचा गोलायदारपणा तयार करण्यात ती ‘अर्ध उठावात’ जरी कोरली गेलेली असली तरी त्यातून “पूर्णत्वाचा” आभास निर्माण करण्यात कलाकार यशस्वी झाला आहे, कलाकार त्याच्या कलेत किती निपुण होता , कलेतील पारंगतता त्याने अवगत केली होती याची प्रचीती आपल्याला आज ही आल्यावाचून राहत नाही.
सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर देखील ग्राहकांनी खरेदी सुरू राहिल्याने मंगळवारी नवी दिल्लीत सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी वाढून ९१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने स्पष्ट केले. तसेच चांदीची चकाकीही वाढली असून तिचा भाव देखील प्रति किलो १,०२,५०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकांवर पोहोचला आहे.
मुंबईत देखील स्टँडर्ड सोन्याचा (२२ कॅरेट) भाव प्रति १० ग्रॅम ८८,३५४ रुपयांवर मंगळवारी होता. सोमवारच्या तुलनेत यात २५३ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध २४ कॅरेट सोन्याचे भाव १,३०० रुपयांनी वाढून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. सोन्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत नवीन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे.
मंदीच्या भीतीने अमेरिकी अर्थव्यवस्थेला ग्रासले असल्याने सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर भूराजकीय तणावात वाढ झाल्यामुळे एकूणच भावना अनिश्चित आहे. शिवाय आखाती देशांमधील अस्थिरतेमुळे आणि चीनच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहनाच्या योजनांमुळे, गुंतवणूकदारांकडून सुरक्षित आश्रय म्हणून सोन्याच्या मागणीत आणखी भर पडली आहे. जागतिक पातळीवर, स्पॉट गोल्डने प्रति औंस ३,०२८.४९ डॉलरचा नवीन उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे, कॉमेक्स गोल्ड फ्युचर्सने प्रति औंस ३,०३७.२६ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांभोवती असलेली अनिश्चितता, अमेरिकेतील मंदीची भीती आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने एक आकर्षक पर्याय आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमॉडिटी विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले. शिवाय, अलिकडच्या अमेरिकी अर्थव्यवस्थेसंबंधी प्रतिकूल आकडेवारीमुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह (फेड) या वर्षी अनेक वेळा व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा देखील वाढली आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढतच जाईल, असेही गांधी म्हणाले.

मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ माजला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या वादातून सोमवारी नागपुरात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, तोडफोड आणि जाळपोळ झाली. बजरंग दलासह अनेक गट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत होते, त्यावेळी दोन्ही समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. ३०० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीवर अशा राजकारणाचा काय उपयोग, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.


