


‘‘मुस्लीमविरोधी असलेले वक्फ सुधारणा विधेयक संसदेत संमत व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता देशातील ख्रिश्चन धर्मीयांना लक्ष्य केले आहे,’’ अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली. संघ विचारांच्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाच्या संकेतस्थळावर कॅथलिक चर्चच्या जमिनींविषयी लेख प्रसिद्ध करण्यात आला. मात्र वाद झाल्यानंतर हा लेख संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे.
‘भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे? कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद’ असे शीर्षक असलेल्या ऑर्गनायझरच्या या लेखात दावा करण्यात आला आहे की, कॅथलिक संस्थांकडे सात कोटी हेक्टर जमीन आहे, ज्यामुळे ते सर्वात मोठे गैरसरकारी जमीन मालक आहेत. गुरुवारी संकेतस्थळावर हा लेख प्रकाशित करण्यात आला. मात्र विरोधी पक्षांकडून या लेखावर जोरदार टीका झाल्यानंतर संकेतस्थळावरून हा लेख काढून टाकण्यात आला.
संसदेत मुस्लीमविरोधी वक्फ दुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर संघ आता आपले लक्ष ख्रिाश्चनांवर वळवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘‘वक्फ सुधारित विधेयकाद्वारे मुस्लिमांना लक्ष्य केले जात असून भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक आदर्श निर्माण करत आहे, असे मी म्हटले होते. संघाला ख्रिाश्चनांकडे लक्ष वेधण्यास वेळ लागला नाही. मात्र राज्यघटना ही एकमेव ढाल आहे, जी आपल्याला अशा हल्ल्यांपासून वाचवते आणि अशा हल्ल्यांपासून जनतेचे रक्षण करणे हे सामूहिक कर्तव्य आहे,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.
या लेखामुळे केरळमध्येही वाद निर्माण झाला. केरळचे मुख्यमंत्री आणि माकप नेते पिनराई विजयन यांनी संघावर टीका केली. ‘‘संसदेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर, संघ परिवार कॅथलिक चर्चला लक्ष्य करत आहे असे ‘ऑर्गनायझर’च्या लेखातून दिसून येते. चर्चच्या संपत्तीचा अकाली, अनावश्यक उल्लेख काही अशुभ संकेत देतो. जरी हा लेख मागे घेण्यात आला असला तरी, त्यामुळे संघ परिवाराच्या मनात काय आहे हे उघड झाले. हा लेख संघ परिवाराचा इतर धर्मांबद्दलचा अतिरेकी द्वेष प्रदर्शित करतो. अल्पसंख्याकांना लक्ष्य करून एकामागून एक नष्ट करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग म्हणून याकडे पाहिले पाहिजे,’’ असे विजयन म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘‘कोणीतरी एक जुना लेख डाउनलोड केला आणि तो पुढे ढकलला. तो लगेच उलटतपासणी करून हटवण्यात आला. भाजप आणि आरएसएस कॅथलिक चर्चच्या खूप जवळचे आहेत. कॅथलिक चर्चने कोणाचीही जमीन बळकावलेली नाही. राहुल गांधींचा राज्यात जनाधार घटला असल्याने ते खोडसाळपणा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत,’’ असा आरोप वडक्कन यांनी केला.
● कॅथलिक चर्चच्या जमिनींवर चर्च, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये यांसह अनेक संस्था आहेत. या मालमत्तेची एकूण अंदाजे किंमत २०,००० कोटी रुपये आहे, ज्यामुळे चर्च भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक झाला आहे.
● वक्फ बोर्डांच्या अंतर्गत असलेले महत्त्वपूर्ण भूखंड भारतातील कॅथलिक चर्चच्या मालकीच्या जमिनींपेक्षा जास्त नाहीत.
● ब्रिटिश राजवटीत कॅथलिक चर्चने त्यांच्या जमिनीचा बराचसा भाग ताब्यात घेतला. १९२७ मध्ये ब्रिटिश प्रशासनाने भारतीय चर्च कायदा मंजूर केला, यामुळे चर्चला मोठ्या प्रमाणात जमीन अनुदान देण्यात आले.
● यापैकी अनेक मालमत्ता मिशनरी संस्था, शाळा आणि धार्मिक केंद्रे स्थापन करण्यासाठी वापरल्या गेल्या. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हे जमीन अनुदान चालू राहिले.
● मिशनरी शाळांसारख्या काही ख्रिाश्चन संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना प्रलोभन देतात आणि त्यांचे धर्मांतर घडवून आणतात. आदिवासींच्या जमिनी हळूहळू चर्चकडे हस्तांतरित केल्या जात असल्याच्या घटना घडल्या आहेत.



वसई – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेवर अंडी फेकण्यात आल्याने विरारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.
विरारमध्ये सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चिखलडोंगरी येथून यात्रेला सुरवात झाली. संध्याकाळी एकता पार्कजवळून शोभायात्रा जात असताना अज्ञात व्यक्तीने अंडी फेकली. यामुळे एकच खळबळ उडाली. बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.


खणखणीत सांघिक प्रदर्शनाच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा यंदाच्या हंगामातला हा चौथा सलग पराभव आहे.
गुजरातने खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला बाद केलं. त्याने ८ धावा केल्या. फटकेबाजीला सुरुवात केलेल्या अभिषेक शर्माला सिराजनेच तंबूचा रस्ता दाखवला. त्याने १८ धावा केल्या. पाठोपाठ इशान किशनही बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला स्थिरावू दिलं नाही. ५०/३ वरून हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांनी ५० धावांची भागीदारी केली. साई किशोरने क्लासनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने २७ धावा केल्या. पुढच्याच षटकात नितीश रेड्डीला माघारी धाडत हैदराबादला अडचणीत आणलं. त्याने ३१ धावा केल्या. उर्वरित
षटकांमध्ये अनिकेत वर्मा (१४ चेंडूत १८) आणि कर्णधार पॅट कमिन्स (नाबाद २२) यांनी उपयुक्त खेळी करत हैदराबादला सन्मानजक धावसंख्या गाठून दिली. सिराजने १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. प्रसिध कृष्णा आणि साईकिशोर यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन मोहम्मद शमीची शिकार ठरला. पॅट कमिन्सने जोस बटलरला बाद केलं. यामुळे गुजरातची अवस्था १६/२ अशी झाली. मात्र यानंतर शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. गुजरातसाठी पदार्पणात वॉशिंग्टनने ४९ धावांची सुरेख खेळी साकारली. शमीच्या गोलंदाजीवर अनिकेत वर्माने सुरेख झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. कर्णधार शुबमनने सूत्रधाराची भूमिका निभावत संयमी अर्धशतकी खेळी साकारली. वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर शेरफन रुदरफोर्डने वेगवान पवित्रा स्वीकारला. त्याने अभिषेक शर्माच्या एका षटकात १८ धावा वसूल केल्या. गिलने ४३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. रुदरफोर्डने १६ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.

Crime News : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे गव्हाच्या शेतात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे प्रकरण पोलिसांनी उलगडले आहे. पोलिसांनी अनावधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणात प्रियकर इरफान आणि डॉक्टर नफीस यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर एसपींनी पत्रकार परिषदेत मृत्यूचे रहस्यही उघड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रेयसी आणि डॉक्टर मृतदेह लपवण्यासाठी गव्हाच्या शेतात फेकून पळून गेले. मृत महिला 4 महिन्यांची गर्भवती होती आणि तिचे लग्न झाले होते पण तिचा नवरा परदेशात काम करत होता आणि ती तिच्या सासऱ्यांसोबत घरी राहत होती.
वास्तविक, मृत महिला शहनाज बानो हिचे लग्न अंतूच्या जगदीश गावातील रहिवासी मकबूल अहमदशी झाले होते. मकबूल त्याच्या नोकरीसाठी सौदी अरेबियात राहतो. या काळात तिचे इरफानसोबत अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. इरफानचे माहेरचे घर अंतू येथे होते. त्याच्या माहेरी भेट देताना तो शहनाज बानोच्या संपर्कात आला. तर मृत शहनाज बानो ही 2 एप्रिलच्या रात्री तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. त्यानंतर मृताच्या सासरच्यांनीही पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. लालगंज पोलीस ठाण्याच्या गौतमपूर वॉर्डमधील गव्हाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळला.
एसपींनी सांगितले की, मृत महिला 4 महिन्यांची गर्भवती होती. ती तिचा प्रियकर इरफानसोबत गर्भपात करण्यासाठी लालगंजच्या खाजगी संजीवनी रुग्णालयात पोहोचली, जिथे शहनाज बानो या महिलेला गर्भपातादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाला. ज्यामुळे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने, प्रियकर इरफान आणि डॉक्टर नफीस अहमद यांनी मृतदेह दुचाकीवर बसवून रात्री गव्हाच्या शेतात फेकून दिला. पोलिसांनी अनावधानाने झालेल्या हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे आणि दोघांनाही तुरुंगात पाठवले आहे. आपला गुन्हा लपविण्यासाठी, प्रियकर मृतदेह लपवून सर्वांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता.
खाजगी रुग्णालय संजीवनी नर्सिंग होमवरही कारवाई करण्यात आली आणि रुग्णालय सील करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर एसडीएम लालगंज आणि डेप्युटी सीएमओ राजेश कुमार यांनी रुग्णालयावर कारवाई केली आणि ते सील केले. संजीवनी नर्सिंग होम आणि कल्पना अल्ट्रासाऊंडवर कारवाई करण्यात आली आहे. कल्पना अल्ट्रासाऊंड चालवणाऱ्या डॉ. हसनैन यांच्याविरुद्ध लालगंज पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी, खाजगी रुग्णालय आणि अल्ट्रासाऊंड सेंटरवर कोणत्याही आदेशाशिवाय महिलेवर गर्भपात केल्याचा आरोप आहे, जो बेकायदेशीर आहे. त्याच वेळी, पोलिसांनी प्रियकर इरफान आणि डॉक्टर नफीस यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले आहे.


पुणे : ‘ज्यातून काहीही फलनिष्पत्ती होत नाही, अशा साहित्य संमेलनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्या तुलनेत अभिजात भाषा म्हणून मराठीला मिळणारे १० कोटी रुपये ही फार मोठी रक्कम नाही,’ अशी टीका करून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी साहित्य संमेलनाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘मराठीचा वाचक दिवसागणिक म्हातारा होत चालला असून तरुण पिढी इंग्रजीकडे वळत आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी सगळ्या घटकांचा समन्वय साधत एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, ज्योत्स्ना प्रकाशनाचे मिलिंद परांजपे, संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या अमृता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
पठारे म्हणाले, ‘‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर, रा. भि. जोशी यांच्यासारख्या पूर्वसुरींनी केलेले काम प्रकाशकांनी वेळोवेळी प्रकाशित केले. त्यामुळेच मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्याकरिता सरकारदरबारी बाजू ठामपणे मांडता आली. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये प्रकाशकांसह मराठी भाषक नागरिक, वाचक, साहित्य क्षेत्रातील संस्था, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या परीने आवाज उठवला.’
‘भाषा जेवढी प्रदूषित होते, तेवढा तिचा विस्तार होतो. इंग्रजी भाषा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असून, मराठी भाषेनेही इतर भाषांमधील शब्द स्वीकारून त्याचा विस्तार केला पाहिजे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असे काहीही नसून मराठीची सर्व रूपे एकमेकांना बळ देणारी आहेत. त्यामुळे एकमेकांचा आदर करून मराठी भाषा जोजवली पाहिजे. आपणच मराठी भाषेचे मारक ठरलो असून हिंदीमध्ये संवाद साधून आपली भाषा सोडत आहोत. जो स्वत:ची भाषा सोडतो, ती भाषा कालांतराने लोप पावते. – प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक