



पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तातडीची वैद्यकीय मदत न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत भिसे कुटुंबीयांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला असून, रुग्णालयाने पेशंटला दाखल करून न घेणे ही गंभीर चूक असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाला हा अहवाल सादर केला असून, सविस्तर तपास सुरू आहे.
पुढील दोन दिवसांत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल. रुग्णाशी संबंधित वैद्यकीय अहवाल, कागदपत्रे आणि इतर साक्षींचा अभ्यास करून निष्कर्ष मांडला जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तनिषाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप करत, “ज्या गोष्टी आमच्यासोबत घडल्या त्या सर्व माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवर आमचा रोष आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील,” असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले.

साहस Times :- संघर्षभूमी येथे सुरू असलेल्या १४ दिवसीय भीमजयंती महोत्सवात सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेली १० वर्षे सातत्याने होणाऱ्या या कार्यक्रमात यंदाही प्रबोधनपर व्याख्यानासह प्रतिमा पूजन, सामूहिक वंदना आणि सांस्कृतिक सहभागाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्धांच्या पुतळ्याला पुष्प अर्पणाने झाली. त्यानंतर सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. सामूहिक वंदनेनंतर, प्रमुख वक्ते पंकज भटकर यांनी ‘नैतिकतेचे आणि मानवतेचे आश्रयदाते सम्राट अशोक’ या विषयावर सखोल व्याख्यान दिले.
आपल्या भाषणात भटकर यांनी सम्राट अशोकांचा इतिहास, कलिंग युद्धानंतरचे मनपरिवर्तन, प्रमुख शिलालेख व त्यामधील नैतिक संदेश, लेण्यांचे महत्व, तसेच धम्म प्रचार आणि प्रसार याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सम्राट अशोकांनी नैतिकतेला आणि मानवतेला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. किर्तीराज लोणारे यांनी सम्राट अशोकांच्या शिलालेखांमधील तत्वज्ञान आणि संदेश यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन सुभाष घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन संजय हतागळे यांनी केले. ‘सरणतंय गाथेने’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या वेळी ॲड. शाम तांगडे, विश्वनाथ सावंत, चंद्रमणी गोवंदे, नरसिंग तरकसे, वसंत वाघमारे, शंकर भटकर, शामसुंदर परतवाघ, रुपेश जोगदंड, प्रमोद सिताप, भारत सातपुते, द्रुपदाआई सरवदे, ज्योतीताई हतागळे, सुमित्राताई पोटभरे, डॉ. सुरेखाताई चव्हाण, रमाताई सिताप, मिनाताई परतवाघ, आरतीताई भटकर, शोभाताई घोडके, शारदाताई बनसोडे, सरस्वतीताई लांडगे यांची उपस्थिती लाभली.

Love Story Movies On OTT: करोनानंतर ओटीटी हे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम झालं आहे. काही चित्रपट फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केले जातात. तर काही चित्रपट आधी थिएटरमध्ये आणि नंतर ओटीटीवर प्रदर्शित होतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट व वेब सीरिज पाहता येतात.
ओटीटीवर तुम्हाला फक्त क्राइम-थ्रिलरच नाही तर अनेक रोमँटिक चित्रपट पाहायला मिळतात. ज्यात प्रेम, भावना, संघर्ष, ब्रेकअप व ऋणानुबंध उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. तुम्हाला ‘सनम तेरी कसम’ व ‘लैला मजनू’ सारखे चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीव उपलब्ध हे तीन चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटाचे क्लायमॅक्स पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Hridayam on OTT : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘हृदयम’ अनेकांना आवडला होता. प्रणव मोहनलाल, कल्याणी प्रियदर्शन आणि दर्शना राजेंद्रन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट विनीत श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अरुण नीलकंदन (प्रणव मोहनलाल) नावाचा मुलगा चेन्नईला इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी येतो आणि तेथील सर्वात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो.
कॉलेजमध्ये तो दर्शना (दर्शना राजेंद्रन) नावाच्या मुलीच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडतो. पण, नंतर काहीतरी घडतं, ज्यामुळे त्यांचं ब्रेकअप होतं आणि इथेच कहाणीत ट्विस्ट येतो. या सिनेमाचा क्लायमॅक्स खूप चांगला आहे. चित्रपटाला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टावर उपलब्ध आहेत, तसेच तो तुम्हाला यूट्यूबवर मोफत पाहता येईल.
Dia on OTT : २०२० मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट ‘दिया’ हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. यात पृथ्वी अंबर, दीक्षित शेट्टी, कुशी आणि पवित्रा लोकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा खूपच भावुक आहे. यात दिया नावाच्या एका तरुणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. दिया अंतर्मुख असते, पण ती तिच्या कॉलेजमधील एका मुलाच्या प्रेमात पडते आणि तिचं आयुष्य बदलतं.
अंतर्मुख असल्याने दिया तिचं प्रेम व्यक्त करू शकत नाही आणि हेच तिच्या आयुष्यातील मोठं आव्हान ठरतं. या चित्रपटाचा शेवट पाहून तुम्ही हादरून जाल. आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळालेला हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. तसेच तो युट्यूबवरही उपलब्ध आहे.
Three Of Us on Netflix : ‘थ्री ऑफ अस’ २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात जयदीप अहलावत, शेफाली शाह, स्वानंद किरकिरे यांनी तीन महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात शेफाली शाहने जे पात्र साकारलं आहे तिला स्मृतीभ्रंशची समस्या असते. पूर्णपणे स्मृतीभ्रंश होण्याआधी तिला तिच्या कोकणातील गावात जाऊन काही दिवस राहायचं असतं. तिथे तिला तिच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जगायच्या असतात. तसेच बालपणी ज्याच्यावर तिचं प्रेम असतं, त्याला भेटायचं असतं.
ती पतीबरोबर गावी जाते, तिथे गेल्यानंतर काय घडतं, हा भावनिक प्रवास तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे.

waqf law : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक शाखेच्या मणिपूर शाखेचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घराला रविवारी रात्री जमावाने आग लावली. अस्कर अली यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याचे समर्थन केल्याने जमावाने त्यांचे घर पेटवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे ही घटना घडली आहे. अलीयांनी शनिवारी सोशल मीडियावर सीएएला पाठिंबा दर्शविला.

Sensex Crashes 4000 Points: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांवर अमेरिकेने लादलेल्या टेरिफचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसत आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कामध्ये जशास-तसं धोरणानुसार भरमसाठ वाढ करण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजाराचा कारभार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शेअर बाजार 4000 पॉइण्ट्सने पडला. आज शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरत असल्याचं चित्र पहिल्या काही मिनिटांमध्येच स्पष्ट झालं आहे. बाजार सुरु झाल्यानंतर 19 लाख कोटींचा काही मिनिटांत चुराडा झाला असून छोट्या गुंतवणुकदारांचं दिवाळं निघाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच असं घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात एकाच वेळी पडझड झाली आहे.
निफ्टीमध्ये 1100 अंकांची पडझड पाहायला मिळाली. निफ्टीचा कारभार 21800 अंकावर सुरु झाला. तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये जवळपास 4000 अंकांची पडझड होईल असा अंदाज होता मात्र बाजारात कारभार सुरु झाला तेव्हा तो 3915 अंक घसरणीसहीत सुरु झाला. आज दिवसभाचा कारभार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 71900 अंकावर होता. बँक निफ्टीमध्ये 2000 अंकांची पडझड दिसून आली. निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्समध्ये 3400 अंकांची पडझड झाली असून तो सध्या 47249 च्या आसपास आहे. इंडिया व्हीआयएक्स 56 टक्के तेजीत आहे.
शुक्रवारी कारभार बंद झाला तेव्हा ज्या स्तरावर सेन्सेक्स होता त्यामध्ये 3915 अंकांच्या पडझडीसहीत उघडला. आज दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 71449 अंकावर होता. निफ्टी 1146 अंकांनी पडून 21758 अंकांवर उघडला. बँक निफ्टी 2166 अंकांनी पडून 49336 वर सुरु झाला. रुपयाच्या दरामध्येही 50 पैशांची पडझड झाली असून रुपयाचा दर 85.74 प्रति डॉलर इतका आहे. निफ्टी 50 चे सर्व शेअर्समध्ये पडझड दिसत आहे. सुरुवातीला भारती एअलटेल हा एकमेवर स्टॉक सकारात्मक होता. मात्र तो सुद्धा नंतर पडला. सर्वाधिक पडझड ही टाटाच्या शेअर्समध्ये झाली आहे. टाटा स्टील, ट्रेंट, टाटा मोटर्स हे निफ्टीवरील सर्वाधिक फटका बसलेले स्टॉक्स आहेत.

Kamada ekadashi Date and Time : कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात, दु:ख दूर होते,असं म्हणतात. या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते. जाणून घेऊ या कामदा एकादशी कधी आहे? या एकादशीचे धार्मिक महत्त्व काय? पूजा विधीचा काय आहे?
वैदिक पंचांग नुसार, कामदा एकादशी ८ एप्रिल रोजी आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजेच 7 एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार. ही तिथि दुसऱ्या दिवशी ८ एप्रिल रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी संपणार. सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे कामदा एकादशी ही ८ एप्रिल रोजी आहे.
कामदा एकादशी अत्यंत खास मानली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे पाप दूर होतात तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. या दिवशी विष्णूच्या काही मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते. कामदा एकादशीच्या दिवशी दान करणे पुण्याचे कार्य मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी जर कोणतीही व्यक्ती अगदी मनापासून काही गोष्टी दान करतात, भगवान विष्णू त्यांची सर्व इच्छा पूर्ण करतात.
कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवळी सकाळी उठून स्नान करावे. लाकडी पाटावर पिवळा कापड टाकून विष्णूची प्रतिमा स्थापन करावी. त्यानंतर फळ, फूल आणि पंचामृत अर्पित करावे. तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर फळ, फूल आणि पंचामृत अर्पित करावे. तुपाचा दिवा लावून उपवासाचा संकल्प करावा आणि कथा वाचावी. उपवासानंतर ब्राम्हण किंवा गरीबाला अन्नदान करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा.
कामदा एकादशीचा उपवास करणारे लोक ९ एप्रिल रोजी उपवासाचे पारण करतील. सकाळी ६ वाजून दोन मिनिटांपासून ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याचा शुभ वेळ आहे उपवास सोडल्यानंतर अन्न किंवा पैसा दान करणे खूप चांगले मानले जाते.

मुंबई : भाजप नेत्यांनी देशात धर्मांधतेचे विष कालविले आहे. देशाला ही जातीयता भारी पडणार आहे. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन एक होण्याची गरज आहे. सर्वांचे डोळे उघडण्याची हीच वेळ आहे. धर्मांधतेची विषवल्ली पेरणाऱ्यांना दूर ठेवले पाहिजे, अशी कठोर टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
भाजप नेत्यांनी प्रभू रामचंद्रांप्रमाणे वागावे, असा सल्लाही ठाकरे यांनी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देताना दिला.शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शिवसंचार कॉल सेंटर’ उपक्रमाचे उद्घाटन ठाकरे यांनी केले. मृत्यू पावल्यानंतर एकत्र येण्यापेक्षा जिवंत असताना एक झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समस्त हिंदू एक होण्याच्या विधानावर व्यक्त केली.
प्रभू रामाचे नाव घेण्याची पात्रता भाजपच्या नेत्यांमध्ये नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन त्या उद्याोगपती मित्रांना दिल्या जाणार आहेत. वक्फ बोर्डानंतर ख्रिाश्चन, गुरुद्वारा, जैन आणि हिंदू मंदिराच्या जमिनीदेखील घेऊन त्या उद्याोगपती मित्रांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जाती-धर्मांत भांडणे लावली जात आहेत.– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना (ठाकरे)