





उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी २४ तास मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणा कुठल्याही क्षणी भारतात आणलं जाऊ शकतं…त्याला एका खास विमानानं भारतात आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबई यापैकी एका शहरातील तुरुंगात त्याला ठेवण्यात येईल. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी NIAची टीम अमेरिकेत दाखलही झाली आहे.
२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणलं जाणार आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय. त्यामुळे राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यासाठी NIAची टीम अमेरिकेत दाखल झालीय. राणाला दिल्लीत आणणार की मुंबईत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. NIAकडून 2 आठवड्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे..त्यानंतर न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
– मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार
– मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा जुना मित्र
– तहव्वूरचा जन्म पाकिस्तानातील
– पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काही काळ काम
– 1997मध्ये तो कुटुंबासह कॅनडात स्थायिक झाला
– शिकागोत इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली
– 2006 ते 2008 दरम्यान हेडली अनेकदा रेकीसाठी मुंबईत आला
– हेडलीच्या प्रवासाबाबत शंका येऊ नये म्हणून राणाने मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडलं
– मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता
– 2009 अमेरिकन तपास यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतलं
आता तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय. यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारचं कौतुक केलंय. मात्र सरकार तहव्वूर राणावर कडक कारवाई करणार अशी अपेक्षाही देशपांडेंनी व्यक्त केली आहे. तर जोपर्यंत राणाला भारतात आणलं जात नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
तहव्वूर राणा याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यानं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIसह मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता. राणानं दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीची मदत केली होती. त्यानं हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकीही केली होती. 26\11च्या हल्ल्यातील जखमा अजूनही ताज्या आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा खूप उशिरानं भारताच्या हाती लागलाय. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जात आहे.


लोकसत्ता टीम
बुलढाणा: बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील आणि मोताळा तालुक्यातील सधन शांतताप्रिय गाव म्हणून ओळख असलेले शेलापूर गाव, परिसर आज बुधवारी, ९ एप्रिलला अक्षरशः हादरला. शेलापूर गावातील एका माजी सैनिकाने आपल्या दोन बोअरच्या बंदुकीने दोनदा गोळीबार केला. अगदी क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे. यामुळे घटना स्थळी उपस्थित गावकऱ्यांची अक्षरशः पाचावर धरण बसली आणि धावपळ उडाली.
घटनेनंतर या पठ्ठ्याने घटना स्थळावरून पोबारा केला. मात्र बोराखेडी ( तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा) पोलिसांनी त्यांनी जीवावर उदार होत कसेबसे ताब्यात घेतले. त्याला बोराखेडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याचे बोराखेडी पोलिसांनी सांगितले. कारवाई सुरु असल्याने या गोळीबारचा विस्तृत तपशील येथे कळू शकला नाही. घटना स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( बुलढाणा) बि. बि. महामुनी, मलकापूर चे उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी भेटी देऊन घटना स्थळाची पाहणी केली. तसेच बोराखेडी पोलिसांना सूचना व निर्देश दिले.
येथे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शेलापुर येथे आज बुधवारी, ९ एप्रिल रोजी दुपारी ही खलबळजनक घटना घडली. २ बोअर च्या बंदुकीचा परवाना मिळालेल्या एकाचा शुल्लक कारणावरून संताप अनावर झाला.एवढा की त्याचा हात कंबरेला लटकवलेल्या बंदुकीवर गेला. रागाच्या भरात त्याने बंदूकीतून एक गोळी झाडली. शेलापुरातील एका हॉटेलवर शुल्लक कारणावरून राडा झाला. अनिल चिम (वय ५० वर्षे) हा त्याच्या साथीदारांसोबत हॉटेलवर बसलेला होता.
यावेळी ‘कोल्ड्रिंक बॉटल’ फेकण्यावरून वाद उद्भवला. वाद वाढत गेला तसा माजी सैनिक असलेल्या अनिल चिम याचा संताप अनावर झाला.त्याने थेट त्याच्या परवाना धारक बंदुकीतून दोन गोळ्या फायर केल्या. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटनास्थळ बुलडाणा मलकापूर रस्त्यावरच असल्याने काही वेळ एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी सैनिक असलेल्या आरोपी चिम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बोराखेडी पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याने यापूर्वी देखील अनेक कारनामे केल्याची चर्चा होत आहे.

दररोज, कोट्यवधी प्रवासी देशभरातील भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन, भारतीय रेल्वे हजारो गाड्या चालवत आहे. या गाड्या देशातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख ठिकाणांना एकमेकांशी जोडतात. भारतीय रेल्वेची गणना देशातील सर्वात मोठ्या वाहतूक व्यवस्थेमध्ये केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतीय रेल्वे ही मालवाहतुकीबरोबरच वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे. भारतीय रेल्वेमुळे प्रवाशांना कमी खर्चात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवणे सोपे होते.
आपल्यापैकी बहुतेक जण ट्रेनने प्रवास करतात. त्याच वेळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतीय रेल्वे एका दिवसात किती पैसे कमवते? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. हा आकडा तुम्हाला नक्कीच हादरवून टाकेल यात काही शंका नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे दररोज 400 कोटी रुपये कमावते. भारतीय रेल्वेसाठी मालवाहतूक गाड्या सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतात.
जर आपण भारतीय रेल्वेच्या मासिक उत्पन्नाबद्दल बोललो तर ते सुमारे 12 हजार कोटी रुपये आहे. भारतीय रेल्वे देशभरात हजारो मालगाड्या चालवते, ज्या लाखो टन माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात.
मालगाड्यांव्यतिरिक्त, प्रवासी गाड्या देखील भारतीय रेल्वेला भरपूर महसूल मिळवून देतात. मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, भारतीय रेल्वेला भंगार आणि रेल्वेने जारी केलेल्या निविदांमधूनही महसूल मिळतो.
भारतीय रेल्वे ही देशातील रोजगाराचा एक प्रमुख स्रोत आहे. हे देशातील लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पातळीवर रोजगार देत आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी रेल्वेशी संबंधित उद्योगांमध्ये गुंतलेले लोक, प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये वस्तू विकणारे व्यापारी इत्यादींचा समावेश आहे.

पुणे : शाॅर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागातील गोकुळनगर परिसरात मध्यरात्री घडली. मोहन माणिक चव्हाण (वय ४३), आतिश मोहन चव्हाण (वय २३, दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोकुळनगर भागात एका पत्र्याच्या खोलीत मोहन आणि आशिष राहायला होते. मध्यरात्री सिलिंडरमधून गॅसगळती होऊन स्फोट झाल्याची माहिती वारजे अग्निशामक केंद्राला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, तांडेल मरळ, जवान भिलारे, माने, साळुंखे, ओव्हाळ यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दोघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
शाॅर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्या वेळी चव्हाण गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघे जण झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले. खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फाेट झाला. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मोहन मजुरी करायचे. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांना तीन मुलगे असून, एक मुलगा गावी असतो. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला आतिश आणि त्याचा भाऊ वडिलांसोबत राहत होते. आतिशचा भाऊ वारजे भागातील एका उपाहारगृहात कामाला होता.
हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची येथील कचरा डेपोत मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग भडकल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे पाच बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. दलाचे केंद्रप्रमुख कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. यापूर्वी डेपोतील कचऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कचऱ्याने पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरतात. आग धुमसत राहते. त्यामुळे कचरा डेपोतील आग आटोक्यात आणण्यासाठी तेथे बंब तैनात करण्यात आले. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी वेळ लागतो, अशी माहिती माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.
