


मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या कामाचा कालावधी वाढल्यामुळे सल्लागारांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. न्यायालयीन खटले व करोना टाळेबंदीमुळे आधीच हा कालावधी वाढला होता. त्यात पंतप्रधानांचे दौरे, टॅंकरचा संप, कामासाठी मिळणारे कमी तास यामुळे काम लांबल्याचा दावा सल्लागारांनी केला आहे. तसेच विविध तांत्रिक बाबींमुळेही खर्च वाढल्याचा दावा करीत दोन सल्लागारांनी मुंबई महापालिकेकडे अधिकचे मानधन मागितले आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतच्या सागरी किनारा प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात आले आहे. प्रकल्पापैकी सागरी किनारा मार्गाचे काम झाले असून मार्गाच्यालगतच्या सेवासुविधांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या तीन टप्प्यांसाठी तीन वेगवेगळे सल्लागार नेमण्यात आले आहेत. तर या तीन सल्लागारांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी व कामात एकसंघता यावी याकरीता एक सर्वसाधारण सल्लागारही नेमण्यात आला आहे. तीन टप्प्यांपैकी दोन सल्लागारांनी पाचव्यांदा शुल्कवाढीसाठी मागणी केली आहे.
प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या टप्पा एक साठी नेलेल्या सल्लागाराची नेमणूक ऑक्टोबर २०१८ पासून ७२ महिन्यांकरीता करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंत विविध कारणांमुळे चार वेळा शुल्क वाढवले आहे. आता पाचव्यांदा पुन्हा एकदा शुक्ल वाढवण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यांचे मूळ शुल्क ५० कोटी ५२ लाख होते. त्यात यापूर्वी एकदा ८ कोटींची वाढ करण्यात आली. नंतर करोना व टाळेबंदीमुळे काम लांबल्याने आणखी ६ कोटी ६५ लाखांची वाढ करण्यात आली. आता पाचव्यावेळी बांधकाम कालावधी वाढल्यामुळे त्यांनी पावणए चार कोटींचे वाढीव शुल्क मागितले असून त्यामुळे त्यांचे सल्लागार शुल्क ७६ कोटींवर गेले आहे.
बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतच्या टप्पा दोनसाठी नेमलेल्या सल्लागाराचे मूळ कंत्रात ५७ कोटींचे होते. त्यांच्या सल्लागार शुल्कातही वेळोवेळी वाढ झाली आहे. विविध अडचणींमुळे या मार्गाचे काम लांबले. तसेच सागरी मार्गासाठी उभारल्या जाणाऱ्या पुलाच्या तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे खर्चात वाढ झाल्याचाही दावा सल्लागाराने केला आहे. या सल्लागारानेही पाचव्यांदा शुल्कवाढ मागितली असून त्याचे मूल्य ९५ कोटी ६९ लाखांवर गेले आहे.
ही आहेत कारणे जलवाहतूक करून प्रकल्पासाठी लागणारे साहित्य आणावे लागते. त्यात जलवाहतूकीला लागणारा वेळ, रात्रीच्यावेळीच काम करण्याचे बंधन असल्यामुळे होणारा विलंब, वाहतूक वळवण्याची परवानगी, अर्धी मार्गिका हस्तांतरित केल्यामुळे शिल्लक कामांसाठी कमी वेळ, पंजाब येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे साहित्य पुरवठा होण्यास झालेला वेळ, पंतप्रधानांच्या भेटीमुळे अवजड वाहतूकीवर आलेले निर्बंध, टॅंकर चालकांचा दोनदा झालेला संप अशा विविध कारणांमुळे प्रकल्प कालावधी लांबला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या सल्लागाराने शुल्क वाढवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कधीही हल्ला करु शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. मात्र भारत सध्या वॉटर स्ट्राईक करुन पाकिस्तानची कोंडी करतोय. त्या वॉटर स्ट्राईकचा दुसरा अंक चिनाब नदीवर बघायला मिळाला.
पाकिस्तानी लष्कर भारतीय सैन्य कधी हल्ला करतील याच्या चिंतेत असताना सर्व पाकिस्तानी आणि पाक सरकारचा घसा कोरडा करणारा अजून एक निर्णय भारत सरकारनं घेतलाय. 1960 सालच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणीही रोखलंय. जम्मू कश्मीरच्या रामबन परिसरात चिनाब नदीवर बगलिहार धरण आहे. या धरणाचे सर्व दरवाजे आता बंद करण्यात आलेत.
यामुळं पाकिस्तानच्या दिशेनं वाहणारी चिनाब नदी आता कोरडीठाक पडलीय. भारताच्या या वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा घसा कोरडा होणाराय. आणि पाकिस्तानी थेंब थेंब पाण्यासाठी तरसणार आहेत. झी मीडियाची टीम या नदीच्या परिसरात पोहचली तेव्हा काय चित्र दिसलं बघुया. पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानं चिनाब नदीवर आलेल्या भारतीय आनंद व्यक्त केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात केलेली ही दुसरी मोठी वॉटर स्ट्राईक आहे. खरंतर भारतात सिंधु, झेलम आणि चिनाब या मोठ्या नद्या आहे. ज्या पुढे पाकिस्तानात जातात. मे महिन्यात पाऊस नसला तरी मे ते सप्टेंबर या काळात हिमालयातील बर्फ वितळून ते पाणी या नद्यांना येऊन मिळतं. हे लाखो लिटर पाणी भारतीय हद्दीतून पाकिस्तानात जातं. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं पाणी रोखून भारत पाकिस्तानला पुरतं जेरीस आणण्याचा प्लान आखत आहे.

उर्वशी खोनासह दिलीप राठोड झी 24 तास मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे. संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरु झालंय. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. संभाव्य हवाईहल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचे मानले जाते.
भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय. पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार…. अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे. या मॉकड्रिलमधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन्स सक्रिय केले जाणार
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देणार
रात्रीच्यावेळी शत्रूला महत्वाची ठिकाणं समजू नये म्हणून ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार
महत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील
बचावकार्याचं सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा
याच्या मार्गशक सूचना देण्यात येतील
प्रशिक्षणाअभावी 1971च्या युद्धात लोकांचा नाहक बळी गेल्याची आठवणही संरक्षणतज्ज्ञांनी करुन दिली आहे. नुकताच युक्रेनवर हल्ला झाल्यावेळीही तिथल्या मेट्रो स्टेशनचा वापर बंकर म्हणून करण्यात आला होता. भारतातील भूमिगत रेल्वे स्टेशनचा वापरही बंकर म्हणून करण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांतही युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता तयार होणार आहे.



आयपीएल २०२५ मध्ये आज सनरायझर्स हैदराबादचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळत आहे. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे राहणाऱ्या शमीला ही धमकी देण्यात आली आहे. शमीला ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने अमरोहा पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे, त्यानंतर अमरोहाचे पोलिस अधीक्षक अमित कुमार आनंद यांच्या आदेशानुसार, अमरोहा सायबर सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात एका शेतघरात स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट होऊन त्यात पाच लाख ३० हजारांची रोकड आणि १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० पोती धान्य आदींचे नुकसान झाले. या आगीत एका गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला. सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विंचूर गावात शेतवस्तीवर राहणा-या शिवप्पा लगमनण्णा फुलारी यांच्या शेतघरात दुपारी अचानकपणे स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यावेळी फुलारी यांची तीन मुले दुसऱ्याच्या शेतात (द्राक्ष बाग) कामाला गेली होती. तर पत्र्याचे शेड प्रखर उन्हात जास्तच तापू लागल्याने शिल्पा फुलारी हे पत्नी व नातवंडांसह घरासमोरील एका झाडाखाली बसले होते. तेव्हा एका पत्राच्या शेडमध्ये स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर वस्तीला आग लागली. स्फोटाच्या आवाजामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी फुलारी वस्तीवर धाव घेतली.
दुपारच्या रणरणत्या उन्हात लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न अपुरे पडले. तोपर्यंत शेतघरातील रोकड, सोन्याचे दागिने, धान्यसाठा, दुचाकी आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पत्र्याच्या शेडजवळ एका गाईच्या वासराला बांधले होते. ते वासरू आगीत मृत्युमुखी पडले. या आगीमुळे फुलारी कुटुंबातील १५ जणांचा संसार उघड्यावर पडला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी नुकसानग्रस्त शेतघराचा पंचनामा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मंडळ अधिकारी व तराठ्यांनी फुलारी यांच्या जळीत शेतघराच्या नुकसानीचा पंचनामा केला.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलत अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, नागरी संरक्षण सुरळीत पणे सुनिश्चित करण्यासाठी राज्ये ७ मे रोजी मॉक ड्रिल करतील. केंद्र सरकारने जारी केलेल्या या आदेशाची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि केव्हाही युद्धासारखे वातावरण असताना हा आदेश जारी करण्यात आला आहे.