



Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: “राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे व हे ठसे कायमस्वरूपी राहतील. मोदी व शहांनी देशात विद्वेषाचे राजकारण सुरू केले. मात्र राहुल गांधी यांनी त्याला छेद देणाऱ्या ‘मोहोब्बत के दुकान’चे राजकारण सुरू केले. गांधी यांनी आता सांगितले की, ‘‘काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण पक्षाने इतिहासात जे काही चुकीचे केले त्याची जबाबदारी मी आनंदाने घेतो.’’ गांधी यांनी जे सांगितले ते सांगण्यास 56 इंचाची छाती लागते व गांधी यांच्याकडे ती आहे हे त्यांनी अलीकडे वारंवार दाखवून दिले,” असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधीपक्ष नेते राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“1984 च्या शीखविरोधी दंग्याविषयी व त्याआधीच्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या बाबतीत राहुल गांधींनी जे मत मांडले ते धक्कादायक आहे. शिखांच्या भावनांना धक्का पोहोचवणाऱ्या या कृती होत्या. ‘ही पक्षाची चूक असेल तर त्याची जबाबदारी मी घेतो. काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण जर काही चुकले असेल तर मी जबाबदारी घेतो,’ असे सांगण्यास धाडस आणि वाघाचे काळीज लागते. गांधी यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीत विद्यार्थी व पत्रकारांशी केलेला संवाद प्रकाशित झाला. गांधी हे निर्मळ, स्वच्छ मनाचे कणखर नेतृत्व आहे हे त्यांच्या बोलण्यातून सिद्ध होते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले हा त्याच्या फौजफाट्यासह बसला होता. त्याने सगळ्यांना वेठीस धरले होते. सुवर्ण मंदिरात बसून तो खलिस्तानचे फूत्कार सोडीत होता व शीख समुदायाची माथी भडकवत होता. पाकिस्तानचे त्याला समर्थन होते. अशा वेळी भिंद्रनवाले व त्याच्या खलिस्तानी फौजांचा खात्मा करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालेचा खात्मा करण्यासाठी सुवर्ण मंदिरात रणगाडे व सैन्य घुसवले. भिंद्रनवाले मारला गेला. सुवर्ण मंदिरासही हानी पोहोचली. खलिस्तानी चळवळीचे कंबरडे तेव्हा मोडले नसते तर स्वतंत्र खलिस्तान पाकड्यांच्या मदतीने उभे राहिले असते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धाडसाने हे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ घडवले व त्याची किंमत प्राणाचे बलिदान देऊन त्यांना चुकवावी लागली. शीख अंगरक्षकांनीच पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. त्यानंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत अनेक शिखांना प्राण गमवावे लागले हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हे धाडस होते. त्या वेळेची ती गरज होती, पण शीखविरोधी दंगलीत काँग्रेस पुढाऱ्यांचा उघड सहभाग म्हणजे अक्षम्य अपराध होता,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“राहुल गांधी यांनी आता मोठ्या मनाने या चुकांची जबाबदारी स्वीकारली. खरे तर राहुल यांना हे असे करण्याची गरज नव्हती. श्रीलंकेच्या मदतीस भारतीय शांती सेना पाठवून जाफनात तामिळींचे अड्डे नष्ट करणे हेसुद्धा धक्कादायक होते व त्याची किंमत पुढे राजीव गांधींना चुकवावी लागली. तामीळ अतिरेक्यांनी राजीव गांधींची हत्या केली, पण धाडसी निर्णय घेण्याची कुवत काँग्रेस नेतृत्वात होतीच. कारण काँग्रेसचा पिंड हा स्वातंत्र्य लढा, संघर्ष, चळवळीतून तयार झाला आहे. भाजप नेतृत्वाने गेल्या पंधरा वर्षांत अनेक चुका केल्या. त्या चुकांची जबाबदारी ते घेणार आहेत काय?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
“नोटाबंदीचा निर्णय हा देशाची अर्थव्यवस्था व मध्यमवर्गीय समाजाला उद्ध्वस्त करणारा होता. हजारो लोक बँकांच्या रांगेतच मरण पावले. अर्थव्यवस्थेचे बारा वाजले व मोदी चूक मान्य करायला तयार नाहीत. जीएसटीसारखे राक्षसी कायदे उद्योग-व्यापाराची वाट लावत आहेत. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवाद नष्ट होईल हे मोदी व शहांचे सांगणे होते, पण कश्मीरात नेमके उलटे घडत आहे. पुलवामापासून पहलगामपर्यंतच्या घटना धक्कादायक आहेत. जवान व निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले जात आहेत. या चुकांची जबाबदारी घेऊन अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, पण चुका मान्य करण्याची दानत भाजपमध्ये नाही. आपण जणू आकाशातील झग्यातून पडलो आहोत, अशा गुर्मीत भाजपवाले वावरत असतात. त्यामुळे चुका मान्य करणे वगैरे त्यांच्या चौकटीत बसत नाही,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
“पुलवामा आणि पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांनाच घ्यावी लागेल, पण चुका आणि जबाबदारी स्वीकारण्याचे जे साहस राहुल गांधी दाखवतात ते साहस भाजप नेतृत्वात दिसत नाही. गांधी यांनी सांगितले की, ‘‘भाजप जे सांगतो, त्याला मी हिंदू विचार मानत नाही. हिंदू विचार अधिक बहुजनवादी, अधिक सर्वसमावेशक, अधिक प्रेमळ, सहिष्णू आणि मोकळा असल्याचे मी मानतो.’’ राहुल गांधी यांचे हे विधान ऐतिहासिक आहे. भाजप हा हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीवाहक नाही, तर ठेकेदार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी हिंदू विरोधकांच्या शेजेवर चढण्यासही ते तयार असतात. याबाबतीत त्यांनी निर्लज्जपणाचा कहर चालवला आहे. सर्व पक्षांतील भ्रष्ट आणि व्यभिचारी लोकांना, गुंड टोळ्या चालवणाऱ्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. ही चूक आहे असे त्यांना वाटत नाही,” असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
“‘काँग्रेस रिकामी करा व भाजप वाढवा’, असा दिव्य मंत्र महाराष्ट्रात त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. या चुकांची जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवणारा नेता भाजपमध्ये आज नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारली व ते पुढे गेले. याला म्हणतात धाडस, दिलदारी व नेतृत्व. भाजप नेतृत्वाकडे या गुणांचा लवलेशही नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

पुणे :‘शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांवर कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल अतिक्रमण विभागाने दररोज सादर करावा,’ असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणांबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
शहरातील अतिक्रमणांची संख्या वाढत असून, नागरिकांना पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर तसेच फिरती पथकेही नियुक्त केली आहेत. मात्र, तरीही अतिक्रमणे होत असल्याने चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अतिक्रमण विभागाचे प्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील सर्वच भागात अतिक्रमण विभागाने, फिरती पथके, स्थिर पथकांना नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दररोज आढावा घेतला जात आहे.- उपायुक्त संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका

पुणे : भूमी अभिलेख विभागामध्ये गेल्या चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असल्याची कबुली देऊन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सरकारला घरचा आहेर दिला. ‘भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्याबरोबर जमाबंदी आणि नोंदणी अधिनियम कायदे कालबाह्य झाले आहेत. त्या कायद्यातील दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.
भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्या कारभाराबद्दल गंभीर तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याची सविस्तर चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्तालयाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार लवकरच विशेष पथकाची स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, ‘भूमी अभिलेख विभागात गेल्या चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे. या घोटाळ्याचा आकार खूप मोठा आहे. या विभागातील अधिकारी मोरे, पाटील यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या पद्धतीने जमिनीच्या नकाशात फेरफार केले आहेत. अमुक एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याची जमीन तिसऱ्या नावावर करण्याचे प्रकार केले आहेत. चुकीचे ले आउट पाडण्यात आले आहे. त्यावर इमारती बांधल्या गेल्या. त्याला महापालिकेने परवानग्या दिल्या आहेत. एक नकाशा चुकला, तर त्याचे परिणाम कित्येक पिढ्यांवर होतात.
ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडून अर्ज मागविले जाणार आहेत. येत्या १७ आणि १८ मे रोजी हे शिबिर घेतले जाणार आहे. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी या चौकशी पथकाचा भाग करावा लागणार आहे. सातबारा, फेरफार यांच्यात दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. चुका दुरुस्त करताना विविध कायदे वापरावे लागणार आहेत. असे चुकीचे काम करणारे अधिकारी हवेत कशाला, असे स्पष्ट करून या अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागाचा कारभार सुधारण्यासाठी काही कृति आराखडा आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘जमाबंदी, नोंदणी अधिनियमातील काही कायदे बदलावे लागतील. काही कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करावे लागतील. याबाबत जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांना सूचना केली आहे.’
२० ते ४० वर्षे अधिकारी पुणे, मुंबईतच
भूमी अभिलेख विभागातील काही अधिकारी २० ते ४० वर्षे पुणे, मुंबईतच ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या नकाशावर विदर्भ किंवा अन्य जिल्हे नाहीत, अशी कबुली बावनकुळे यांनी दिली. या विभागातील बदल्यांच्या पद्धती आणि कायमस्वरूपी या शहरांमध्ये राहण्याच्या प्रवृत्तीमुळे अधिकाऱ्यांमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती वाढल्या असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पुणे : ‘नफा कमावणे हाच कोणत्याही व्यवसायाचा उद्देश असतो. पण, नफ्यापेक्षा चांगले ग्राहक जोडणे हेच व्यवसायाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यादृष्टीनेच वाटचाल सुरू आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सोमवारी सांगितले. ‘पुणेकर चोखंदळ असले तरी त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर ते मनापासून प्रेम करणारे आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांची प्रशंसा केली.श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘तुळशीबाग व्यापारी कट्टा’ उपक्रमात सौरभ गाडगीळ यांच्याशी मंडळाचे नितीन पंडित यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी गाडगीळ बोलत होते.
गाडगीळ म्हणाले, ‘दाजीकाका गाडगीळ यांच्यामुळे पु. ना. गाडगीळ म्हणजे पुण्याचे, असा सराफी पेढीचा लौकिक झाला. व्यवसाय करायचा हे निश्चित असल्याने मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. समोरचा काय चाल करणार आहे याचा अंदाज बांधण्याची शक्ती बुद्धिबळाच्या खेळातून आली. व्यवसायामध्ये आधुनिकता आणली पाहिजे या माझ्या विचारांना दाजीकाकांनी पाठिंबा दिला. त्यातून केवळ लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या पेढीची २००१ मध्ये पौड रस्त्यावर शाखा सुरू केली. ‘पेशवाई दागिने, शिंदेशाही तोडे ही आमची खासियत आहे. पण, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हवे तसे दागिने करून देतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली येथे मराठी लोकसंख्या मोठी असली तरी मराठी सराफ नाही. त्यामुळे दुकान सुरू करण्याचा सल्ला एका हितचिंतक मित्राने दिला. त्यानुसार तेथे शाखा सुरू केली. अडचणी झाल्या तरी त्यातून मार्ग काढत यशस्वी झालो,’ असे गाडगीळ यांनी सांगितले.
पीएनजी ज्वेलर्सची सध्या ५३ दुकाने आहेत. प्रत्येक दुकानामध्ये किमान ४० ते ४५ कोटींची गुंतवणूक असते. दागिने विकून किती पैसे मिळणार? मग भांडवल उभारणीसाठी कंपनीची स्थापना करताना समभाग क्षेत्रात पदार्पण करून ‘आयपीओ’ काढले. त्यालाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता मी नसलो तरी व्यवसाय थांबणार नाही, अशी व्यवस्था उभी केली आहे.- सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

पुणे : पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. मात्र विमानतळासाठी जमीन द्यायचीच नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. विमानतळाला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सात गावांतील शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलावर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
विमानतळाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सात गावांतील शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सात गावांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि उदाचीवाडीचे बाधित शेतकरी संतोष हगवणे, एखतपूरचे उपसरपंच तुषार झुरंगे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
‘आम्हाला जमीन द्यायची नाही. आमची काळी आई विकायची नाही, तर तुम्ही जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न का करता?’ असा प्रश्न हगवणे यांनी उपस्थित केला.आम्ही विमानतळाच्या विरोधी आंदोलनात सहभागी होतो. गावातील महिलांच्या अंगावर काही कर्मचारी धावून आले. लाठीमार केला. उलट आमच्यावरच खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही दगडफेक केलीच नाही, असेही हगवणे म्हणाले.
विमानतळासाठी आम्हाला जागा द्यायची नाही, यावर आम्ही ठाम आहोत. ही सात गावे आता एक परिवार झाले आहेत. परिवाराचा एक व्यक्ती म्हणून आम्ही परिवारात चर्चा करू शकतो. त्यामुळे सरकारला जमीन द्यायची नाही, असे सांगितले असले, तरी सरकारने आमच्याकडे दुसरा पर्याय मागितला आहे. त्याबाबत चर्चा करावी लागेल, असे हगवणे यांनी सांगितले.या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. जमिनी घेण्याबाबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वी भूमिपुत्रांवर गुन्हे का दाखल करण्यात आले, त्यावर चर्चा करा. त्याचा निर्णय घ्या, हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी झुरंगे यांनी केली.

पुणे : सरकारचा नाकर्तेपणा आणि शहरांमधील बेजबाबदार नागरिकांमुळे पाणीसमस्या उद्भवली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्यापाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा निवृत्त सनदी अधिकारी आणि भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी दिला. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती समजून न घेता पुणे-मुंबईसारख्या शहरातील नागरिक अमाप आणि अयोग्य पद्धतीने पाणी वापर करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील ‘गोदाप्रेमी समिती’चे अध्यक्ष देवांग जानी यांना ‘रंगत-संगत प्रतिष्ठाना’च्या काव्य विभागातर्फे लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी देशमुख बोलत होते. प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या प्रज्ञा महाजन या वेळी उपस्थित होत्या.
देशमुख म्हणाले, ‘मानवाने प्रत्येक नदीशी खेळ केला आहे. नदी कोरडी होणे म्हणजे जणू स्त्रीची अब्रू घेणे आहे. जसजशी शहरे श्रीमंत होत गेली तसतशा नद्या कोरड्या पडत गेल्या. हे समजून घेताना नदीने आत्महत्या केली, की दुराग्रही माणसाने तिचा खून केला याचा विचार होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज व तहान वाढली आहे. परंतु पिण्याचे पाणी हे अक्षय नाही. पाणी वापराबरोबरच त्याचे पुनर्भरण होते की नाही याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पाणी मुबलक आहे म्हणून उधळू नका.
विहिरी, तलाव, हौद, उपनद्या पुनर्जीवित कराव्यात.’
देवांग जानी म्हणाले, ‘नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील १७ प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जिवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. त्याविरुद्ध शासनाशी लढा देत नदीपात्रातील पाच कुंडांतील सुमारे पाच लाख किलो सिमेंट काढण्यात यश आले. त्यातून स्रोत जिवंत झाले. गोदावरी नदी ही नाशिक शहराचे हृदय आहे तर उपनद्या म्हणजे वाहिन्या आहेत. निसर्गाकडून आपण फक्त ओरबाडून घेत आहोत. त्याला परत काहीच देत नाही, ही मानवाची मोठी चूक आहे. नद्या निसर्गनिर्मित आहेत, त्यांच्यात मानवी हस्तक्षेप वर्जित आहे.’
पुणे शहरात मुबलक पाणी उपलब्धी आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर केला जात आहे. याविषयी जागृती करूनही पुणेकर पाण्याचा निष्काळजीपूर्वक वापर करीत आहेत. आम्ही पैसे देतो त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढे पाणी मिळावे अशी पुणेकरांची हट्टी भूमिका आहे.- लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती

सावंतवाडी : ‘‘शक्तिपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ,’’ असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केले.
सावंतवाडी येथे भाजप कार्यालयात राणे आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्या वेळी विरोधाला विरोध करणाऱ्यांची आणि विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जंगल कोणी राखत नाही. ते आपोआप राखले जाते, वन्यजीव ते राखतात, असे विधान राणेंनी केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या बातमीबद्दल त्यांना विचारले असता त्याने काही फरक पडत नाही, ते महाराष्ट्राला काय देणार, असे राणे म्हणाले.
