साहस Times :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशनच्या जमादया हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अनोळखी व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, एलसीबीच्या पथकाने ४८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या प्रकरणाचा छडा लावून तीन आरोपींना अटक केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच हादरवून सोडले. आईच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने स्वतःच्या मुलाची हत्या करण्यासाठी आईनेच सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. या अमानुष कटात सामील असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आई-मुलाच्या नात्यालाच काळीमा फासणारी ही घटना असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे
फलटणमध्ये अभिमानाचा क्षण — कु. रसिका मोहिते यांची पुणे शहर पोलीस पदावर निवड; बारस्कर गल्लीत सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
फलटण :- फलटण येथील बारस्कर गल्लीमध्ये आज अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. मा. श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल मोहिते (नाना) यांची लाडकी पुतणी कु. रसिका राजेंद्र मोहिते हिची पुणे शहर पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल तिचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा श्री रंगारी महादेव मंदिर, बारस्कर गल्ली येथे सायंकाळी ७.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास वसंतराव काकडे तसेच नगरसेविका स्मिता शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नेहरू गणेशोत्सव मंडळ, जयदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ, मरीमाता नवरात्र उत्सव मंडळ आणि दत्तनगर मित्र मंडळ यांच्या वतीने रसिका मोहिते हिचा सन्मान करण्यात आला. तिच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तिच्या यशाचा अभिमान व्यक्त केला. हा सोहळा बारस्कर गल्लीसाठी एक प्रेरणादायी आणि गौरवशाली क्षण ठरला.
करुणा, मैत्री आणि धम्मभावनेतून आयु. बाबासाहेब जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
फलटण : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस, श्रामणेर तथा बौद्ध धम्माचे अभ्यासक व प्रचारक आयु. बाबासाहेब दिलीप जगताप यांचा वाढदिवस धम्ममय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव म्हणाले की, जगताप सर हे रयत शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत भगवान गौतम बुद्धांची करुणा जोपासणारे व्यक्तिमत्त्व आहेत. विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करणारे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक व छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगणारे प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी जगताप सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड म्हणाले की, जगताप सर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे पाईक आहेत. त्यांच्या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी पारिजातका मॅडम यांची मोठी साथ लाभली असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी सरांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी आपल्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी जगताप सरांचे आदर्श शिक्षक व मार्गदर्शक म्हणून कौतुक करताना, ते सर्वांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, मदतीचा हात देणारे आणि हसमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. त्यांनी बुद्ध, धम्म व संघ यांच्या बलाने सरांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या.
माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे कार्यरत असलेले जगताप सर हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रचार व पर्यटन विभागाचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र मोरे म्हणाले, जगताप सर समता सैनिक, उत्तम बौद्धाचार्य, आदर्श शिक्षक व गायक म्हणून सुपरिचित आहेत. धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये हे त्यांचे योगदान अतुल्यनीय आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गेली अनेक वर्ष होते धम्माचा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं काम करतात. त्यांना मी वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो.
यावेळी आयु. बाबासाहेब दिलीप जगताप यांच्या सुविद्य पत्नी म्हणाल्या, आमच्या सरांनी स्वतःपेक्षा माझ्या शिक्षणाला, माझ्या विचारांना कायमच प्रोत्साहन दिले आहे. समाजामध्ये बौद्ध धम्माचा विचार रुजवण्यामध्ये, प्रचार व प्रसारामध्ये ते कायमच प्रयत्नशील असतात. माझ्या कुटुंबीयांचा तसेच माझ्या वडिलांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्याने कायमच एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व म्हणून माझ्या सासरी व माहेरी दोन्ही ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडावी एवढीच मी इच्छा व्यक्त करते. व त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देते.
यावेळी भारतीय सैन्य दलातील फौजी आयु.विकास गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, आयु अविनाश अहिवळे, आयुनि संध्या अहिवळे, आयुनि अश्विनी मोरे यांनी ही मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम धम्ममय वातावरणात पार पडला.
फलटण, दि. १० एप्रिल : फलटण तालुक्यातील ढवळ गावात काल रात्री एका युवकावर काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गंभीर मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारापूर्वी किंवा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे ढवळसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले तरी, स्थानिक नागरिकांमध्ये एका मुलीच्या कारणावरून हा वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या बाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा व इतर प्रक्रिया सुरू केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, तपासाअंतीच घटनेचे खरे कारण आणि आरोपींबाबतची अधिकृत माहिती समोर येणार आहे.
फलटण प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर), फलटण येथे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी भव्य “भीम फेस्टिव्हल” उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात “प्रबुद्ध हो मानवा” फेम शाहिर विजयजी सरतापे यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण सादरीकरणातून भीम व बुद्ध गीतांची मैफल रंगवली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षक त्यांच्या सुरेल आवाजाने अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रभावी उजळणी करण्यात आली. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समाजात प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक महोत्सव विशेष ठरला. युवकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि आंबेडकरी विचारांची प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. स्थानिक नागरिकांसह परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. आयोजकांनी हा महोत्सव भव्य स्वरूपात यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, सर्व स्तरातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला
प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या अमोल भोसले यांना शुभेच्छांचा वर्षाव
फलटण (प्रतिनिधी) :भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयुष्यमान अमोल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या मनोगतात अमोल भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, ते अत्यंत साधे, सरळ, प्रामाणिक आणि सात्विक स्वभावाचे असून त्यांच्या कुटुंबाचा धम्मप्रसारासाठी सातत्यपूर्ण त्याग आणि समर्पण उल्लेखनीय आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या “प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या” व्यक्तिमत्त्वाचे ते उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या कार्यातून समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट परंपरांविरोधात जनजागृती होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात माजी अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनीही अमोल भोसले यांना वाढदिवसानिमित्त मंगलकामना व्यक्त केल्या. त्यांनी वंदना सूत्रपठण घेत सर्व उपस्थितांमध्ये मंगल मैत्रीची भावना जागृत केली. कार्यक्रमादरम्यान बीबीएम फॅमिलीच्या वतीने आयु. अमोल भोसले यांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी संघटक आनंद जगताप, धम्म उपासक विजय जगताप तसेच बौद्ध उपासक-उपासिका आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शेवटी सर्वांनी बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या बलावर अमोल भोसले यांचे आयुष्य सुख, समृद्धी आणि सेवाभावाने परिपूर्ण होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
भीमोत्सवानिमित्त राजाळे येथे विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर
फलटण : राजाळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महिला समितीच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मौजे राजाळे येथे करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि विवेकनिष्ठ विचारांचा समाजामध्ये प्रसार व्हावा, तसेच अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि अवैज्ञानिक समजुतींना छेद देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भीमोत्सवासारख्या सामाजिक-सांस्कृतिक उत्सवाला वैज्ञानिक विचारांची जोड देत समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा स्तुत्य प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजाळे येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध उपकरणे, मॉडेल्स आणि प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्त्वे, ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, पाण्याचे व्यवस्थापन, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्यविषयक संकल्पना तसेच विविध वैज्ञानिक प्रक्रियांवर आधारित आकर्षक प्रात्यक्षिके मांडली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या मॉडेल्समधून त्यांची वैज्ञानिक जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली.
या प्रदर्शनात जि. प. केंद्र शाळा, राजाळे तसेच श्री जानाई हायस्कूल, राजाळे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपले प्रयोग सादर करत विज्ञान विषयाबद्दलची आवड आणि अभ्यासू वृत्ती प्रदर्शित केली. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण काजल सावंत मॅडम आणि रेणुका निकोडे मॅडम यांनी केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रयोगांचे बारकाईने निरीक्षण करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे, सादरीकरणाची पद्धत, कल्पकता आणि उपयुक्तता यांचे मूल्यमापन केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, विज्ञाननिष्ठा, तर्कबुद्धी आणि समतावादी विचारांचा पुरस्कार केला. त्यांच्याच प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. तसेच समाजात विवेक, विज्ञाननिष्ठा आणि प्रबोधनाची भावना रुजविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. भीमोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या विज्ञान प्रदर्शनाने केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचारांचा जागर घडवून समाजाला प्रगल्भ आणि विवेकनिष्ठ दिशादर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महिला समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला.
साहस Times : कालकथित बौद्ध उपासिका विशाखा इंद्रजीत थोरात यांचे बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी जपान येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते १० वाजता ध्यान साधनेने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १०.३० वाजता भिक्खू संघाचे आगमन होईल. सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत परित्राण पाठ आयोजित करण्यात आला असून, ११.३० ते १२ वाजेपर्यंत भिक्खू संघाला भोजनदान दिले जाईल. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत धम्म देसना होणार असून, दुपारी १.३० ते २.३० या वेळेत उपासक-उपासिकांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आहे. या पुण्यानुमोदन कार्यक्रमास सर्व बौद्ध उपासक-उपासिका तसेच आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, हा कार्यक्रम मंगला व्हॅली क्लब हाऊस, डी-मार्ट पुढे, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा, कल्याण (पश्चिम) येथे पार पडणार आहे. या दुःखद प्रसंगी समस्त थोरात, रोकडे, भिसे, खरात व परकाळे परिवार शोकाकुल आहेत.
फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील मेखळी गावातील बेपत्ता झालेल्या बहिण-भावाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ७ एप्रिल रोजी अचानक बेपत्ता झालेल्या काजल काकासो चोपडे आणि किरण काकासो चोपडे यांचे मृतदेह ९ एप्रिल रोजी निरा उजव्या कालव्यात गुरसाळे हद्दीत आढळून आले.
दोघेही फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून घरी परतत असताना अचानक गायब झाले होते. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नेमके काय घडले याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे, आत्महत्या की घातपात, याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, मृत्यूमागील कारण शोधण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार पेठेतील विशाखा कांबळे हिची महाराष्ट्र पोलिस दलात दमदार निवड
फलटण प्रतिनिधी :- फलटण येथील मंगळवार पेठतील कु. विशाखा चंद्रकांत कांबळे हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात (रत्नागिरी) यशस्वीरीत्या निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या विशाखाने कठोर परिश्रम करून हे यश संपादन केले. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना तिने अनेक अडचणींवर मात केली आणि अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. तिच्या या यशामागे तिच्या कुटुंबीयांचा पाठिंबा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विशाखाच्या या यशामुळे मंगळवार पेठेचे नाव उज्ज्वल झाले असून, इतर तरुण-तरुणींना देखील प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.