


India Restrictions On Pakistan Will Be Continued: काश्मीरमधील पहलगाम 22 एप्रिल रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक डाव हाणून पाडला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. मात्र पाकिस्तानने या घोषणेनंतर अवघ्या तीन तासांमध्ये शस्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पुढल्या काही तासांमध्येच पुन्हा भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले. हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले. 7 मेनंतर पाकिस्तानचा कुठलाच डाव भारताने यशस्वी होऊ दिला नाही. भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानवरील दबाव आणि इतर निर्बंध भारताने अजून उठवलेले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारताने कोणते निर्बंध कायम ठेवलेत पाहूयात…
युद्धविराम करारात कोणत्याही पूर्वअटींचा समावेश नाही. सिंधू नदी पाणी करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचे वितरण आणि वापराचे नियमन करतो. या कराराचा पाकिस्तानला फायदा झाला आहे. पाकिस्तानला या नद्यांमधून एकूण पाण्याच्या सुमारे 80 टक्के पाणी मिळते. हे पाणी पंजाब आणि सिंध प्रांतांसाठी महत्त्वाचे आहे.
अटारी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे. सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालींनंतर भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला. पंजाबमधील अटारी येथील चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत. वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणाऱ्यांना 1 मे पूर्वी याच मार्गाने मायेदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले होते. 1 मे पासून ही सीमा बंद आहे.
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर असलेली बंदी कायम राहणार असल्याचे समजते. थेट बंदी असो किंवा मध्यस्थ देशांद्वारे असो भारताची व्यापरी निर्बंधांची भूमिका कायम आहे. पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. तसेच टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे.
पाकिस्तानात ये-जा करणाऱ्या किंवा पाकिस्तानाच्या हद्दीतून येणाऱ्या विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे. 30 एप्रिलपासून भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई हद्द सोडल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना लांब, पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांवरील भार वाढला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारताने पाकिस्तानी कलाकार आणि कलाकारांवर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना पाकिस्तानमध्ये तयार केलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर डिजिटल सामग्री प्रक्षेपित करु नये असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आङेत.
भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा निलंबित करण्याची भारताची भूमिका कायम आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतात असलेल्यांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले होते. वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला होता, त्यानंतर तोही रद्द करण्यात आला. अखेरची मुदतवाढ ही 1 मे रोजीची होती.



पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना मुलांवर संस्कार करून त्यांना सामाजिक कार्यासाठी मोकळीक देऊन कार्यकर्ता घडविणाऱ्या २१ मातांचा रविवारी हृद्य मातृगौरव सोहळा अनेकांनी डोळ्यांत साठवून ठेवला. मातेचे नाव पुकारताच सुवासिनींकडून होणारे औक्षण, कार्यकर्ता मुलाने प्रेमाने भरविलेला लाडू आणि सर्वांच्या डोळ्यांतून तरळणारे आनंदाश्रू अशा वैशिष्ट्यांमुळे कार्यक्रमात भावनिक ओलाव्याचे रंग भरले गेले.
जागतिक मातृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठच्या वतीने शहराच्या विविध भागांतील २१ गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मातांचा विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार हेमंत रासने, लक्ष्य फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा प्रभुदेसाई, ॲड. प्रताप परदेशी याप्रसंगी उपस्थित होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनीवाल (वीर शिवराज मित्र मंडळ), श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद थोरात आणि ॐ हरिहरेश्वर मंडळाचे राहुल जाधव यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जोशी म्हणाले, ‘परमेश्वराने हे जग निर्माण केले आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय येत राहावा यासाठी त्याने आईची निर्मिती केली. मुलांचे भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ आहे. पैशातील गुंतवणुकीइतकीच नात्यातील गुंतवणूक महत्त्वाची आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक जीवनात कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांना हारांपेक्षा प्रहारच अधिक मिळतात. प्रसंगी टीका आणि अपमान सहन करावा लागतो. कार्यकर्त्यांनी कौतुकाने भारावून जायचे नसते आणि टीकेने व्यथित व्हायचे नसते. कसलीही अपेक्षा न ठेवता हे आभारशून्य काम करावे लागते. ते करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. घर व्यवस्थित असेल तरच बाहेरच्या लढाया लढता येतात.’
प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे काम बघता तेही खऱ्या अर्थाने योद्धे आहेत. समाजासाठी काम करण्यासाठी कुटुंबीयांचे पाठबळ आवश्यक असते. नि:स्वार्थ भावनेने कार्यकर्ते समाजासाठी काम करीत आहेत.’
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्याच्या आईचा सत्कार ही अभिनव कल्पना आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख निर्माण करून देण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मी स्थायी समिती अध्यक्ष असताना कधीही महापालिकेत न आलेली आणि आता आमदार झाल्यानंतर विधिमंडळातही न आलेली माझी आई या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच व्यासपीठावर बसली आहे.
हेमंत रासने, आमदार

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्याकडे खासगी गप्पा रंगल्या होत्या. त्या गप्पांच्या ओघात विषय भारत-पाकिस्तान युद्धाकडे गेला. दोन्ही देशांमध्ये आरपारची लढाई होऊ शकते का, भारताला खरेच ती करायची आहे का, असे उपविषय निघत गेले. भाजपच्या नेत्याचे म्हणणे होते की, पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. वेळोवेळी तो आपण शिकवलाही आहे; पण आपल्याला पाकिस्तानविरोधातील युद्धामध्ये सतत अडकून पडायचे नाही… भाजपच्या या नेत्याचे हे शहाणपणाचे बोल होते. या नेत्याने ही अचंबित करणारी भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हा नेता म्हणत होता की, गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारत इतका बदलला आहे की, आता भारत आणि पाकिस्तानची तुलना होऊ शकत नाही. आपल्याला २०४७ मध्ये विकसित देश व्हायचे आहे, हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. तसे जर आपण केले नाही तर आपण मागे पडू. पाकिस्तानचे दहशतवादी आपण मारत राहू, पण तेवढेच ते पुन्हा जन्माला घालतील. त्यांना मरण्यामध्ये धन्यता वाटते, आपल्याला देशाचा विकास घडवायचा आहे. पाकिस्तानने कुरापती केल्या तर त्याला भारत प्रत्युत्तर देईल, पण पाकिस्तानच्या समस्या आपण आपल्या डोक्यावर कशाला घ्यायच्या, असा या नेत्याचा सवाल होता. भाजपच्या या नेत्याचा युक्तिवाद अजिबात चुकीचा नव्हता. भाजपचे नेते जाहीरपणे बोलत असलेली आक्रमक युद्धखोर भाषा या नेत्याने वापरलेली नव्हती. हा नेता खासगी गप्पा मारत असल्यामुळेही त्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारची भूमिका मांडली असावी. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पण आरपारची लढाई होण्याआधीच शस्त्रसंधीचा पाकिस्तानचा प्रस्ताव, खरेतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव भारताने लगेच मान्य करून टाकला. भाजपचे राष्ट्रीय नेते (ते मोदींच्या विश्वासातील आहेत!), जे सांगत होते ते तंतोतंत खरे ठरले असे म्हणता येईल. प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून युद्धखोरी परवडू शकते, प्रत्यक्षात युद्ध भारताचे मोठे आर्थिक नुकसान करून जाईल हे वेळीच ओळखून मोदी सरकारने आपला हात आखडता घेतला असावा. मोदी सरकारने दाखवलेली परिपक्वता कदाचित भाजपच्या पाठीराख्यांना वा भक्तांना आवडणार नाही; पण पाकिस्तानला खरेतर इतपतच (दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे वगैरे) धडा शिकवणे मोदी सरकारला शक्य होते, हे वास्तव लपून राहात नाही!
दिल्लीतील शनिवारचा दिवस म्हणजे ‘अॅण्टिक्लायमॅक्स’ होता. ‘सरकारी सूत्रांकडून’ असे म्हणत परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयातून अनेक वृत्तसंदेश प्रसारित करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण दलांची संयुक्त पत्रकार परिषद सकाळी साडेपाच वाजता होणार होती. पण नंतर ती साडेदहा वाजता झाली. त्यामध्ये, पश्चिम सीमेवर पाकिस्तानने फौजांची जमवाजमव कशी सुरू केली आहे, पाकिस्तानने संघर्ष कसा तीव्र केला आहे, पाकिस्तानच्या कुरापती कशा वाढू लागल्या आहेत, असे सांगितले गेले. त्यातून चित्र निर्माण झाले की, भारत आता आरपारची लढाई करणार. या विचाराला पुष्टी देणारी माहितीही प्रसारित करण्यात आली. भारताकडून पाकिस्तानच्या आठ लष्करी तळांना लक्ष्य केले गेले, त्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे केंद्र असलेल्या रावळपिंडीतही ड्रोन हल्ला केला गेला होता. असे दिवसभर युद्धखोरीचे वातावरण प्रसारमाध्यमांतून तापत होते. संध्याकाळी सहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद होण्याआधी भारताकडून पाकिस्तानला सज्जड इशारा दिला गेल्याचेही वृत्त आले. पाकिस्तानने पुन्हा कुरापत केली तर अशी कृती युद्ध मानले जाईल, मग भारत तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देईल. त्यासाठी भारताची संरक्षण दले सज्ज आहेत, असा हा इशारा होता.
तेव्हा वाटू लागले होते की, भारताचे सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत घुसू शकते. त्यानंतर तासाभरात थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष संपुष्टात आल्याचे परस्पर घोषित केले. शनिवारी दिवसभरामध्ये युद्धाचा पारा चढला असताना अचानक शांततेची ढगफुटी कशी झाली हे समजलेच नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केले. तेव्हा मात्र भाजपच्या राष्ट्रीय नेत्याचे शहाणपणाचे, पण खासगीतले बोल आठवले! मोदी सरकारने आरपारच्या लढाईची शक्यता असतानादेखील पाकिस्तानला मोकळे का सोडले असावे, हे स्पष्ट झाले.
भारताने शस्त्रसंधी मान्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विनाकारण शंका घेतली जाऊ लागली आहे. समाजमाध्यमांवर आत्तापर्यंत मोदींचे पाठीराखे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी काय केले असते, असा युक्तिवाद करू लागले आहेत. ही तुलना अयोग्य म्हटली पाहिजे. भाजपच्या ‘त्या’ नेत्याने बोलता बोलता इंदिरा गांधींबद्दलही टिप्पणी केली होती. १९७१च्या युद्धामध्ये इंदिरा गांधींनी ९० हजार पाकिस्तानी सैनिक सोडून दिले. भारताचे सैन्य लाहोरपर्यंत पोहोचले होते, तासाभरात लाहोरवर आपण कब्जा केला असता. पण इंदिरा गांधींनी लाहोर सोडून दिले. कदाचित त्यावेळी तशी परिस्थिती निर्माण झाली असेल. इंदिरा गांधींच्या त्या निर्णयावर आत्ता भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे भाजपचे हे राष्ट्रीय नेते म्हणाले होते. इंदिरा गांधींनी त्यावेळी लाहोर ताब्यात घेतले नाही, आत्ता मोदींनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याचे टाळले. मोदींनी कदाचित परिस्थिती पाहून निर्णय घेतला असू शकतो, असे म्हणता येईल. शस्त्रसंधी मान्य केल्यानंतर ‘शीर्षस्थांचा निर्णय योग्य’ ठरवण्यासाठी हाच प्रचार भाजपकडून नजीकच्या काळात केला जाऊ शकतो. नोटाबंदी कशी योग्य होती हे लोकांच्या गळी उतरवण्यात भाजपच्या नेत्यांची फौज जशी यशस्वी ठरली, तसाच आताही मोदींनी कशी दूरदृष्टी दाखवली असा युक्तिवाद लोकांना पटवून दिला जाईल. एकप्रकारे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने स्वपक्षाची मानसिकता उलगडून दाखवली असे म्हणायला हरकत नाही.
शस्त्रसंधी होण्याआधी पडद्यामागून बऱ्याच घडामोडी झाल्या असे ट्रम्प यांच्या घोषणेतून तरी दिसते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणत होते की, भारत-पाकिस्तानच्या भानगडीत आम्ही पडणार नाही. मग असे काय झाले की, ट्रम्प सरकारने घूमजाव केले? अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ आणि व्हान्स दोघांनीही भारत-पाकिस्तान यांच्या संघर्षामध्ये मध्यस्थी केली. ट्रम्प मध्ये पडले नसते तर भारताने कदाचित शस्त्रसंधी केला नसता, असे म्हणायला जागा उरली असती. ट्रम्प यांनी भारताला संघर्ष थांबवायला लावला पण, त्याआधी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रचंड निधीही मिळवून दिला. पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा आहे, निधी दहशतवादासाठीच वापरला जाईल. त्याचा भारताला फटका बसेल असे भारताने वारंवार सांगितले तरीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ऐकले नाही. भारताविरोधातील संघर्ष थांबवण्याच्या अटीवर पाकिस्तानला नवे कर्ज दिले असेल, पण त्या पैशांचा वापर पाकिस्तान कसा करेल यावर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही. ही बाब ट्रम्प यांना माहीत नसेल असे कसे म्हणता येईल. या सगळ्या पडद्यामागील घडामोडींतून निर्माण झालेला प्रश्न हाच आहे की, पाकिस्तानने हे सगळे जमवले कसे? पाकिस्तानने कुरापत काढली, भारताने प्रत्युत्तर दिल्यावर पाकिस्तानने जगभर याचना केली, अमेरिकेकडे धाव घेऊन तुम्हीच आम्हाला वाचवा, असा कांगावा केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पैसेही मिळवले. त्यानंतर अमेरिकेमार्फत शस्त्रसंधी घडवून आणला. पाकिस्तान एकामागून एक गोष्टी पदरात पाडून घेत असताना नवी दिल्लीतून मात्र, आम्ही पाकिस्तानविरोधात लढायला सज्ज आहोत, अशी भूमिका पत्रकार परिषदांत मांडल्या जात होत्या. अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा देखील भारताला करू दिली नाही. पाकिस्तानचा अणुबॉम्ब भारताला रोखू शकत नाही हे दिसले. पण, मग पाकिस्तानकडे असे काय आहे की, अमेरिकेने भारताला शस्त्रसंधी करायला लावला, हे सगळे मुद्दे संसदेच्या अधिवेशनामध्ये विचारले जाऊ शकतात.
भाजपचा राष्ट्रीय नेता म्हणत होता त्याप्रमाणे पाकिस्तानविरोधात आरपारची लढाई भारताला परवडणारी नव्हती. त्यातून भारताचे अधिक नुकसान झाले असते. विकासाची गती खुंटली असती, देशांतर्गत अस्थिरता असेल तर गुंतवणुकीवर परिणाम होतो, महागाई वाढते, बेरोजगारी वाढते. इतकेच नव्हे तर युद्ध जितके लांबते तितकी सत्ताधारी नेतृत्वाची लोकप्रियताही कमी होत जाते. या सगळ्याचा साकल्याने विचार करूनच बहुधा मोदी सरकारने, आम्ही दहशतवादाविरोधात लढत आहोत, अशी किंचित बचावात्मक भूमिका पहिल्यापासून घेतल्याचे दिसले.
या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की, पाकिस्तान नव्हे तर भारतालाही संकटातून वाचवताना ट्रम्प यांनी बदल्यात काय काय मिळवले असेल? शस्त्रसंधी मान्य करताना भारताने अमेरिकेला काय दिले ही माहिती नजीकच्या भविष्यात हळूहळू बाहेर येईल. अमेरिकेतील उद्याोगांना वा गुंतवणूकदारांना कोणत्या सवलती दिल्या गेल्या हे समजले तर भारताने मोजलेल्या किमतीचा अंदाज यथावकाश येऊ शकेल. म्हणून कदाचित भाजपच्या राष्ट्रीय नेत्याचे बोल महत्त्वाचे ठरतात!


केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने ‘डबल इंजिन’चा राज्याला फायदा होतो, असे महायुतीचे नेते वारंवार सांगत असतात. केंद्र सरकारकडून राज्याला भरभरून मिळते, असेही चित्र रंगविले जाते. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात तसेच वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असल्याने केंद्राकडून राज्याला अधिकचा निधी तसेच मदत मिळणे क्रमप्राप्तच ठरते. असे असले तरी केंद्राकडून राज्याला मिळणारी मदत घटत असल्याचेच राज्यातील महायुती सरकारने अलीकडेच १६व्या वित्त आयोगाला सादर केलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्राकडून मिळणारी मदत ही महत्त्वाची आहे. या मदतीचा ओघ घटू लागल्याने राज्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्याला कारण अर्थातच राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी. गेल्या काही वर्षांत राज्याची आर्थिक आघाडीवर अधोगतीच झाल्याचे दिसते. ही बाब पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेही अधोरेखित केली. कारण देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा १५ टक्क्यांवरून घटून १३ टक्क्यांपर्यंत खाली आला. वित्तीय तूट वाढत असताना यंदाचा अर्थसंकल्प हा ४५ हजार कोटी महसुली तुटीचा आहे. कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींवर गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचे कितीही दावे करीत असले तरी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता देताना सरकारला नाकीनऊ आले आणि सामाजिक न्याय वा आदिवासी विकास या समाजातील दुर्बल घटकांशी संबंधित खात्यांचा निधी वळवावा लागला हे सरकारसाठी नक्कीच भूषणावह नाही. वाढत्या खर्चाच्या तुलनेत महसुली उत्पन्न वाढत नसल्याने सरकारची तारांबळ उडते. अशा वेळी राज्यासाठी केंद्राचा आधार महत्त्वाचा असतो.
केंद्राकडून राज्यांना विविध स्वरूपात मदत दिली जाते. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्राचा वाटा अधिक असतो तर राज्यांना काही प्रमाणात रक्कम द्यावी लागते. पण केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधीचे निकषच मोदी सरकारने बदलले. त्यातून केंद्राचा वाटा कमी होऊन राज्यांवरील बोजा वाढल्याची बाब महाराष्ट्र सरकारच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या योजना राज्याला बंदही करता येत नाहीत. २०२१-२२ मध्ये केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीकरिता एकूण खर्चाच्या ७७ टक्के रक्कम केंद्राकडून मिळाली होती. हेच प्रमाण आता ५० टक्क्यांवर आले. परिणामी राज्याचा खर्च वाढला. केंद्राकडून राज्याला २०२२-२३ पर्यंत विविध स्वरूपात ५० हजार कोटींच्या आसपास आर्थिक मदत वर्षाला मिळत होती. २०२३-२४ मध्ये ही मदत ३६ हजार कोटी तर गेल्या आर्थिक वर्षात ३१,८३० कोटी रुपये एवढीच मदत मिळाली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यावर पहिले पाच वर्षे केंद्राने राज्यांना नुकसानभरपाई दिली. आता ही नुकसानभरपाई बंद झाल्याने राज्य शासनाला महानगरपालिका व नगरपालिकांना दरवर्षी आर्थिक मदत द्यावी लागते. त्यासाठी यंदा ३० हजार कोटींपेक्षा अधिक भार राज्याच्या तिजोरीवर आला आहे. पालिकांना द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईसाठी राज्याला स्वतंत्र निधी हवा आहे. १५व्या वित्त आयोगाच्या अहवालानुसार राज्याला चार विभागांसाठी केंद्राकडून देय असलेल्या रक्कमेपैकी सुुमारे २५ हजार कोटींची रक्कम कमी प्राप्त झाली. केंद्राने घातलेल्या जाचक अटींमुळेच या रकमेवर राज्याला पाणी सोडावे लागले. ‘डबल इंजिन’चे सरकार म्हणून महायुतीचे नेते गवगवा करीत असले तरी केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदतीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे राज्य शासनाने सादर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
एकीकडे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत वा भक्कम नाही. दुसरीकडे केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत झालेली घट. केंद्राचीच मदत घटल्याने आता कोणापुढे हात पसरायचे याचीच चिंता राज्याला लागली आहे. महसुली उत्पन्न व खर्च याचा मेळ साधताना राज्याला कसरत करावी लागते. पण केंद्र सरकार मदत देताना हात आखडते घेते हे आकडेवारीच दर्शविते. महाराष्ट्रासारख्या राज्याने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे, असे सुचविले जात असले तरी राज्यात सर्वाधिक ५३ टक्के रोजगार हा कृषी वा कृषीशी संलग्न योजनांवर अवलंबून असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा या क्षेत्राला फटका बसतो. दुसरीकडे, औद्याोगिक उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात झालेल्या पीछेहाटीमुळे औद्याोगिक क्षेत्रालाही फटका बसला आहे. अशा वेळी ‘डबल इंजिन’ चा राज्याला आधार असला तरी एका इंजिनची तेवढी साथ नसल्यास महाराष्ट्रासाठी ते कठीण आव्हान असेल.

मुख्यत: पाऊस कमी झाल्याच्या किंवा पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या या दोन जाती आहेत. या दोन जातींची महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल आदी चौदा राज्यांकरिता शिफारस करण्यात आली आहे. प्रामुख्याने कमी पावसाच्या काळात दुष्काळ, पाणीटंचाईच्या काळात भाताच्या उत्पादनात मोठी घट होत होती. या दोन जातींच्या लागवडीतून कमी पावसाच्या काळातही सरासरी इतके किंवा सरासरीपेक्षा जास्त भात उत्पादन होण्याची शक्यता आहे.
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे हवामानाच्या टोकाच्या घटना घडत आहेत. अति पाऊस, अति तापमान, अति थंडी आणि दुष्काळाच्या घटना वाढल्या आहेत. हवामानाचा हा ताण सहन करणाऱ्या जातींचे जगभरात संशोधन होत आहे. देशातही भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) याबाबत संशोधन करीत आहे. देशात मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या सांबा महसुरी (बीपीटी ५२०४) आणि एमटीयू १०१० (कोट्टोंडोरा सन्नालू) या दोन ताणसहनशील, उत्पादन आणि हवामान अनुकूल आणि मूळ क्षमता टिकवून ठेवणाऱ्या अशा वाणांपासून शास्त्रज्ञांनी ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जाती विकसित केल्या. दोन्ही जातींमध्ये कमी पाण्यातही नत्राचा वापर करून घेण्याची उच्च क्षमता आहे. डीआरआर धान १०० (कमला) हे वाण आपल्या मूळ जातीच्या तुलनेत २० दिवस आधी (१३० दिवसांत) पक्व होऊन लवकर काढणीला येते.
देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी किंवा सुमारे १४० कोटी लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी केंद्र सरकार डाळी, कडधान्ये, तेलबिया, खाद्यातेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजना आखत आहे. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात भात रोज आणि सर्रास वापरले जाणारे धान्य आहे. देशाचे एकूण भात उत्पादन १३०० लाख टनांवर गेले आहे. २०२२-२३ मध्ये १७७ लाख टन, २०२३-२४ मध्ये १७५ लाख टन तांदूळ निर्यात झाली होती. सध्या आपण दरवर्षी ४८ हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात करतो. बिगर बासमती तांदळाची बाजारपेठही विस्तारत आहे. त्यामुळे देशाच्या तांदूळ उत्पादनात वाढ करणे, निर्यात वृद्धीतून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त आर्थिक फायदा मिळवून देण्याला सरकार आणि संशोधकांचे प्राधान्य आहे. आता पाणी, तापमान, थंडीचा ताण सहन करणाऱ्या जातींचा शोध लागल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळेल.
जगभरात हवामान बदल अनुकूल फळे, अन्नधान्य, पालेभाज्यांच्या वाणांचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. देशातही नवीन भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या. प्रत्येक जातीचे उत्पादन, लवचीकता आणि गुणवत्तेचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. जनुकीय संपादित तांदळाच्या जाती यापूर्वी चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी अनेक जाती संशोधनापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. या जातींची व्यावसायिक पद्धतीने लागवड न झाल्यास या वाणांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे देशात संशोधित झालेल्या जातींची प्रचार – प्रसिद्धी करण्याची गरज आहे. हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिफारस केलेल्या सर्व राज्यांत यंदा प्रायोगिक लागवड होण्याची गरज आहे. प्रायोगिक लागवडीतून उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आल्यास आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास या वाणांची व्यावसायिक लागवड होईल, अन्यथा ही नवी वाणेही संशोधनापुरतीच मर्यादित राहतील.

Operation Sindoor Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढाईत 6 – 7 मे रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अर्तंगत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूर अतर्गंत भारतीय सैनिकांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी 11 मे 2025 ला तिन्ही दलांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोहीमेबद्दल सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. भारताने फक्त नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या 30 ते 40 जवान आणि अधिकाऱ्यांना ठार केलं आहे, असं सांगण्यात आलं. त्यासोबत कराची बंदराबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. (Operation Sindoor All preparations were made to attack Karachi port but the signal Navy disclosure dgno)
पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले, ’22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यांनंतर, भारतीय नौदलाचे कॅरियर बॅटल ग्रुप, भूपृष्ठीय दल, पाणबुड्या आणि एव्हिएशन अॅसेट्स ताबडतोब पूर्ण लढाईच्या तयारीत समुद्रात तैनात करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या 96 तासांच्या आत अरबी समुद्रात अनेक शस्त्रांचा वापर करून केलेल्या गोळीबारात आम्ही समुद्रात रणनीती आणि प्रक्रियांची चाचणी घेतली आणि त्यात सुधारणा केल्या.
#WATCH | Delhi: #OperationSindoor | Vice Admiral AN Pramod says, “In the aftermath of the cowardly attacks on innocent tourists at Pahalgam in Jammu and Kashmir by Pakistani sponsored terrorists on 22nd April, the Indian Navy’s Carrier battle group, surface forces, submarines and… pic.twitter.com/ECYUWUpjoj
— ANI (@ANI) May 11, 2025
ते पुढे म्हणाले, ‘आमचे सैन्य उत्तर अरबी समुद्रात निर्णायक आणि प्रतिबंधात्मक स्थितीत तैनात आहे. आमच्या निवडलेल्या वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आहे. भारतीय नौदलाच्या तैनातीने पाकिस्तानी नौदल आणि हवाई दलांना बचावात्मक स्थितीत राहण्यास भाग पाडले. बहुतेक बंदरांच्या आत किंवा किनारपट्टीच्या अगदी जवळ, ज्यावर आम्ही सतत लक्ष ठेवत होतो. आमचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून संतुलित, प्रमाणबद्ध, आक्रमक नसलेला आणि जबाबदार आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानच्या कोणत्याही शत्रुत्वाच्या कृतीला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदल समुद्रात तैनात आहे.