आधुनिक मुंबईची स्थापना झाली ती बौद्ध संस्कृतीच्या ठेव्याला नष्ट करून. एकेकाळी संपूर्ण मुंबई बौद्धमय होती. सात बेटांवर वसलेल्या मूळ रहिवाशांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता, रूजवला होता आणि फुलवला होता. पंधराव्या शतकापर्यंत बुद्ध धम्म इथे तग धरून होता. मुंबईतील स्थानिक लोक बौद्ध धम्माचे अनुयायी होते. मुंबईत, पर्यायाने अपरांतात, बौद्ध धम्म प्रथम आणणारी व्यक्तीही स्थानिकच होती. सम्यक संबुद्धांच्या काळात बुद्ध धम्म इथे पोहचला होता आणि मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांनी त्याचा स्वीकार केला होता.
आज कुर्ल्याच्या पंचशील विहारात प्राचीन काळातील अमूल्य बौद्ध ठेवा जतन केला जात आहे. आज मला या ठेव्या प्रत्यक्ष पाहता आले . पंचशील विहार कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि या शोधाच्या निमित्ताने भेटलेले मित्र यांचे मन:पूर्वक आभार. विशेष आभार कमिटीचे सेक्रेटरी प्रशांत कांबळे, शशांक कांबळे, शरदराव नांदेडकर, स्वप्नील जवळगेकर, आणि माझे सदैव सोबत असणारे यश खुने यांचे. या दोन महत्त्वपूर्ण व्यक्तींचा उल्लेख करणे अनिवार्य आहे – नागवंशीय नंदकुमार कासारे सर आणि ज्ञानकीर्ती सुरेश धोत्रे सर, ज्यांच्या मदतीशिवाय हा शोध पूर्ण झाला नसता.
आज मला एक महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय सम्यक संबुद्धांचे प्राचीन शिल्प पाहता आले, ज्यावर मी सविस्तर लेखन करणार आहे.
सात बेटांवरून मुंबईचा विकास आणि सांस्कृतिक ठेवा
मुंबई सात बेटांवरून विकसित होत असताना, इथला मूळ सांस्कृतिक ठेवा नष्ट करून आधुनिक शहर तयार झाले. या पुरावे आजही मुंबईच्या भूमीत गाडले गेले आहेत. गगनचुंबी इमारती उभारताना काही पुरावे गाडले गेले, काही नष्ट केले गेले, आणि काही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मात्र, कुर्ल्याच्या पंचशील विहारात हा सांस्कृतिक ठेवा आजही जतन केला जात आहे.
1970 साली सम्यक संबुद्धांचे एक प्राचीन शिल्प कुर्ल्यातील प्रकाश लॉजच्या परिसरात पडलेले होते. त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हे शिल्प आपल्या समाजाच्या ताब्यात देण्यात आले. शिल्प मिळवल्यानंतर पंचशील विहाराची स्थापना करण्यात आली, ज्यात या शिल्पाचे जतन करण्यात आले आहे.
काल मी प्रत्यक्ष पंचशील विहारात जाऊन हे शिल्प पाहिले आहे. ग्रॅनाईटच्या अखंड पाषाणात तयार केलेले हे शिल्प अतिशय सुंदर आणि बारकावे असलेले आहे. शिल्पाच्या एका हातात ग्रंथ आहे, ज्यावर ताडाच्या पानांवर लिपिबद्ध केलेले साहित्य व्यवस्थित धाग्याने बांधलेले आहे. चिवराच्या घड्यांपासून ते केसांच्या कुरळेपणापर्यंत, प्रत्येक बारकाव्यावर कलात्मक मेहनत घेतली गेली आहे. तज्ञांच्या मते, हे शिल्प साधारण नवव्या-दहाव्या शतकातील असावे.
तथापि, या शिल्पाचा चेहरा दाक्षिणात्य शैलीतील आहे, आणि यामुळे एक प्रश्न उभा राहतो – हे शिल्प मुंबईत कसे काय आले? उत्तर भारतातील किंवा मध्य भारतातील शिल्प समजायला सोपे आहे, पण दक्षिण भारतीय शैलीतील हे शिल्प मुंबईत का आणि कसे आले?
फेसबुक या आभासी माध्यमाच्या मदतीने या शिल्पापर्यंत पोहोचता आले. या शोधात सहकार्य केलेल्या सर्व मित्रांचे मन:पूर्वक आभार!
Don’t Underestimate the Power of Mumbaikar✌🏻
सूरज रतन जगताप
लेणी अभ्यासक