महायुतीचा सुसाट वारू vs राजेगटाचा गुलदस्त्यातील डाव — फलटण पालिका रणांगण तापले!

0
38
महायुतीचा सुसाट वारू vs राजेगटाचा गुलदस्त्यातील डाव — फलटण पालिका रणांगण तापले!

फलटण प्रतिनिधी :- फलटण पालिका निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड घालमेल सुरू आहे. एका बाजूला महायुतीचा वारू सुसाट धावताना दिसत असताना महाविकास आघाडी मात्र ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

जुन्या राजेगटातील अनेक दिग्गजांनी राजेगटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे कूच केली आहे. नुकत्याच झालेल्या सभेत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीच “मी कोणत्या पक्षात आहे हे मला देखील कळत नाही,” असे वक्तव्य करून सगळ्यांना बुचकळ्यात टाकले. दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे झेंडे फलटण पालिकेवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला असून मुंबईत जाऊन अनेक राजकीय हालचाली केल्या आहेत.

राजकीय सखोल डावपेच रचत आमदार रामराजेंनी सत्ता सोडायची नाही या जिद्दीने ‘सोंगट्या’ फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या अंतिम निर्णयावर अजूनही पडदा असल्याने राजेगटाची भूमिका गुलदस्त्यातच आहे.

फलटण पालिकेवर तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ निर्विवाद सत्ता टिकवून ठेवणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजवर विरोधकांना दोन अंकी आकडा गाठू दिला नाही. मलटण भागात तर माजी खासदार रणजितसिंह यांना बाणगंगा ओलांडू न देणारी ही राजकीय कोंडीही चर्चेत आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या २७–० पराभवाची महायुतीकडून मानसिक तयारी केल्याचे दिसते.

या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) असे महायुतीचे घटक पक्ष एकत्र येत प्रबळ समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजेगटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना फोडून त्यांना राष्ट्रवादीत दाखल करून नगराध्यक्षपदाची कोडी सोडवण्याचा डाव रचल्याची चर्चा आहे.

राजेगट विरुद्ध रणजितसिंह गट असा मोठा राजकीय संघर्ष पेटला असून खासदार गट सध्या चर्चेत असला तरी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नाहीये. दुसरीकडे आपल्या मुलाला नगराध्यक्षपदासाठी तयार करणाऱ्या रामराजेंना गोटातील मोठ्यांनीच साथ सोडल्याने त्यांच्या गणितात खळबळ उडाली आहे.

दोन्ही गटांकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झाले नसतानाही ‘मीच नगराध्यक्ष व्हावे’ अशी मागणी स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर व स्व. सुभाषराव शिंदे गटाकडून होत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील मतदार संपर्काचा पहिला फेरा पूर्ण केला आहे. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह यांच्या राजकीय समीकरणात चांगलाच ताण आणला असून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते ‘धनुष्यबाण’ उचलतील अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, खासदारकीला पराभव झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावून कोट्यवधींचा निधी आणला. “माझा पराभव करण्यासाठी रामराजेंनी अकलूजकरांना साथ दिल्याने मला केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागले,” अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. त्याची परतफेड म्हणून त्यांनी आमदारकीत राजेगटाचा पराभव केला. आता पालिकेत २७–० असा परिणाम साधण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

रामराजे देखील शांत बसणारे नाहीत. “माझा पक्ष अपक्ष आहे, पण मेंदू अजूनही पूर्वीइतकाच चालतो,” अशा शब्दांत त्यांनी संकेत दिले आहेत. एकच ‘फासा’ त्यांच्या हाती आला तरी ते सत्ता परत काबीज करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून दोन्ही दिग्गज फलटणच्या रणांगणात उतरले आहेत.