प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘गुरुकुल प्रकल्पा’च्या समन्वयकपदी निवड
फलटण : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, शिक्षक ते मुख्याध्यापक असा यशस्वी प्रवास करणारे आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पुरस्कर्ते आयुष्यमान श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांची रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या ‘गुरुकुल प्रकल्पा’अंतर्गत समन्वयकपदी निवड झाली आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना श्री. निकाळजे यांनी शिक्षक, क्रीडामार्गदर्शक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांपर्यंत पोहोचले, तर अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, प्रशासकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत यश संपादन केले.
३१ मे २०२६ रोजी मुख्याध्यापक पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि कार्यकर्तृत्वाची दखल घेत ‘गुरुकुल प्रकल्पा’च्या समन्वयकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्थेकडून मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या ३१ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा आणि नेतृत्वगुणांचा गौरव मानला जात आहे.
शिक्षणासोबतच सामाजिक प्रबोधन, बौद्ध धम्म चळवळ आणि परिवर्तनवादी विचारांच्या प्रसारासाठीही ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्र, माजी विद्यार्थी, सहकारी, मित्रपरिवार तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी व संपूर्ण BBM Family यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन होत आहे.
“सेवानिवृत्तीनंतरही शिक्षणाची नाळ कायम ठेवत नव्या जबाबदारीतून विद्यार्थी आणि शिक्षणव्यवस्थेसाठी योगदान देण्याची संधी – हीच निकाळजे सरांच्या कार्यकर्तृत्वाची खरी पावती आहे.”
