बुकमार्क: डॉ. अहंकारींनी घडवलेल्या आरोग्यक्रांतीचा दस्तावेज

0
14
बुकमार्क:  डॉ. अहंकारींनी घडवलेल्या आरोग्यक्रांतीचा दस्तावेज


स्वप्नील जोशी5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यांना समाजभान राखता येतं, तीच मंडळी चळवळ निर्माण करू शकतात. ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावताना तेथील लोकांचे आर्थिक आणि सामाजिक उन्नयन व्हावे, यासाठी आयुष्यभर सक्रिय असणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘शशिकांत अहंकारी – दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाची ही गोष्ट. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे डॉक्टरही पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी आपण काम करावं, असं डॉ. अहंकारींना का वाटलं असेल? वैद्यकीय शिक्षणादरम्यान प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध हा विषय त्यांना का महत्त्वाचा वाटला असेल? याच काळात त्यांना शिक्षक म्हणून लाभलेल्या डॉ. साठे, डॉ. घारपुरे, डॉ. भागवत या प्राध्यापकांचा त्यांच्या मनावर कोणता परिणाम झाला? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेत आपल्या वाचनाची सुरूवात होते.

तत्कालीन औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातील नोटिस बोर्डवर १९८० मध्ये लिहिलेल्या एका मजकुराने सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले जाते.. मग त्यावरून उठलेला गदारोळ, पुढे शशिकांत यांनी केलेले भाषण आणि अंत:र्मुख झालेले श्रोते.. हा प्रसंग वाचताना, वैद्यकीय पेशा स्वीकारल्यावर त्याचे नेमके प्रयोजन काय असले पाहिजे? या कळीच्या मुद्द्यापाशी आपण येऊन थांबतो. डॉ. अहंकारी वयाच्या अठराव्या वर्षीच भोवतालच्या परिस्थितीकडे किती डोळसपणाने पाहत होते, हे आपल्याला जाणवते. मळलेल्या वाटेने पुढे जाणे त्यांना पसंत नव्हते. समवयस्क विद्यार्थ्यांसमोर त्यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव एवढा पडतो की, आपण शिक्षण घेत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकावू लागतो.

ज्या काळात मराठवाड्यातील मुले घरातील आर्थिक परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेवर जात होती, अशा मोठ्या स्थित्यंतराच्या कालखंडात डॉ. अहंकारी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आपला समाज आरोग्यसंपन्न झाला, तरच येथील लोक आर्थिक स्वावलंबी होतील, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यासाठी शिक्षणही गरजेचे होते. अनेक रूढींचा पगडा, वैयक्तिक आरोग्याबाबत असलेले अज्ञान, गरिबी, स्थलांतर अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेले ग्रामजीवन त्यांनी जवळून अनुभवले. रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला असो वा दुष्काळात राबणारे कष्टकरी असोत, या सर्वांसाठी ‘आपण काहीतरी केलं पाहिजे,’ हाच एकमेव ध्यास ते बाळगून होते.

‘ज्वाला आणि फुले’ या बाबा आमटेंच्या काव्यसंग्रहातील कविता त्यांचासाठी प्रेरणा बनली होती. हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक नामवंत नेत्यांच्या सहवसात ते आले. मग विद्यार्थी आंदोलन असो वा अन्यायाविरुद्धची चळवळ असो; या सगळ्यांमध्ये ते अग्रणी राहिले.

वैद्यकीय शिक्षण १९७८ मध्ये पूर्ण झाल्यावर डॉ. बानू कोयाजी यांच्या प्रेरणेने पुण्याजवळील एका लहानशा खेड्यात डॉ. अहंकारी यांनी ‘जनस्वास्थरक्षक पथदर्श प्रकल्पा’मध्ये काम सुरू केले. गावातील मंडळींना प्रशिक्षित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हे एक मोठे आव्हान होते. प्रबोधन शिबिर, तरुणांसाठी रोजगार मेळावा, मोफत आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमांतून त्यांनी अल्पावधीतच गावातील मंडळींचा विश्वास संपादन केला. दरम्यान ही आरोग्य मोहीम केवळ एका गावापुरती मर्यादित न ठेवता ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी ‘हॅलो’ अर्थात ‘हेल्थ ॲन्ड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना केली. गावपातळीवरील सर्व समस्यांबाबत कार्य करण्यासाठी या संस्थेला मूर्त प्राप्त झाले. रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधक उपचार करणे, गावकऱ्यांशी विद्यार्थी आणि तरुण वर्गाला एकत्र करून संवाद साधणे, गाव दत्तक घेऊन गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना आरोग्याच्या सर्व प्राथमिक सुविधा देणे अशा विविध पातळ्यांवर हे काम बहुआयामी होत गेले. हे काम बघून अनेक तरुण आणि नामांकित डॉक्टर संस्थेसोबत आले. आज ‘हॅलो’च्या मुशीतून बाहेर पडलेल्या चारशेच्या वर डॉक्टरांनी आपल्या स्वत:च्या परिसरात या कार्याचा ठसा उमटवला आहे.

एकूणच, डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात उभी राहिलेली ही आरोग्य आणि ग्रामसुधार चळवळ समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक वाचायला हवे. प्रसिद्ध लेखक, विचारवंत अतुल देऊळगावकर यांनीही या कार्याचा योग्य सन्मान होईल, असे ओघवते लेखन केले आहे. डॉ. अहंकारींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’, ‘महिला बचत गट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ अशा कित्येक बहुउद्देशीय प्रकल्पांनी ग्रामीण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडवली. डॉ. अहंकारींचे आयुष्य समाजाला सावलीप्रमाणे लाभले, पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या ठायी कठोर निग्रह, निरलस सेवा आणि भूमीसारखी अपार सोशिक वृत्ती या गुणांचा संगम असल्याने एवढे मोठे कार्य उभे राहू शकले. देशपातळीवरही आरोग्य यंत्रणा सक्षम करुन समाजाला निरामय स्वास्थ्याचा लाभ द्यायचा असेल, तर डॉ. अहंकारी यांच्याप्रमाणेच समर्पित सेवाभावाने कार्य करणाऱ्यांची गरज आहे, याची जाणीव हे पुस्तक करुन देते.

पुस्तकाचे नाव : शशिकांत अहंकारी – दृष्टी आरोग्यक्रांतीची संपादक : अतुल देऊळगावकर प्रकाशक : साधना प्रकाशन पाने : २१४, किंमत : रू. ३००

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link