A son killed his father then filed missing complaint against his father in gadchiroli

0
32
A son killed his father then filed missing complaint against his father in gadchiroli


गडचिरोली: वडिलांची हत्या करुन मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

१५ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे भंडाफोड होण्याच्या भीतीने हादरलेल्या मुलाने चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेतली. मात्र, सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मर्डर मिस्ट्रीच्या थरारपटाचा २ मे रोजी उलगडा झाला. पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रेवनाथ लक्ष्मण कोडापे(५५ , रा. मार्कंडादेव, ता. चामोर्शी असे मयताचे नाव आहे. मुलगा आकाश रेवनाथ कोडापे ( २९ ) व त्याचा मित्र लखन मडावी (२५ , रा. गडचिरोली) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करत. मुलगा आकाश हा देखील मजुरीकाम करायचा. पिता- पुत्रांमध्ये सतत वाद होत. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे देखील वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. १५ एप्रिल रोजी पिता- पुत्रात वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर मित्र लखन मडावीला जीप घेऊन बोलावले व त्यात मृतदेह टाकून दोघांनी बामनपेठ जंगलात मृतदेह फेकून दिला.

हेही वाचा

दुसऱ्या दिवशी आकाशने वडील बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी ठाण्यात दिली. याच दरम्यान, ३० एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बामनपेठ जंगलात आढळला. ही माहिती आकाशला झाली. त्यामुळे आपला भंडाफोड होईल, हातात बेड्या पडतील, यामुळे तो भयभीत झाला, यातून त्याने १ मे रोजी चिचडाेह बॅरेजमध्ये उडी घेतली. त्यानंतर आष्टी पोलिसांनी आकाशची चौकशी केली. यावेळी त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. त्याच्यासह मित्र लखन मडावी यास पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे करत आहेत.

नातेवाईकाला फोन करुन पाण्यात उडी

१ मे रेाजी सकाळी साडेसात वाजता दुचाकीवरुन आकाश चिचडोह बॅरेजवर पोहोचला. यावेळी त्याने आपल्याएका नातेवाईकाला फोन करुन वडील गेले, आता माझ्या भावाला सांभाळा, असे म्हणत मी चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेत असल्याचे कळविले. त्यानंतर त्याने बॅरेजमध्ये उडी घेतली, पण तो तरंगत पाण्यावर आला. याचवेळी एक लोखंडी गज त्याच्या हाती लागला. त्यास पकडून तो तरंगत राहिला. याचदरम्यान कुटुंबीय व नातेवाईकांनी तेथे धाव घेतली व त्यास सुखरुप बाहेर काढले.

वर्षभरापूर्वीच झाला होता आकाशचा विवाह

रेवनाथ कोडापे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. दोन मुलांसह ते राहत. वर्षभरापूर्वी आकाशचा विवाह झाला होता. कौटुंबीक कलहातून आकाशने वडिलांचा जीव घेतला, खुनाच्या आरोपात तो स्वत: तुरुंगात गेला. घरात केवळ आकाशची पत्नी व त्याचा धाकटा भाऊ हे दोघेच राहिले आहेत. वादविवादातून संपूर्ण परिवार उध्दवस्थ झाला.

ओढणीमुळे संशय, चौकशीत गडबडला

घटनास्थळी रेवनाथ यांच्या मृतदेहाजवळ ओढणी आढळून आली. पुरुष ओढणी वापरत नाहीत, त्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय होताच, नंतर आकाशचा आत्महत्येचा प्रयत्न, चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, शिवाय तो घाबरूनही गेला होता. त्याच्या एकूण हालचालींमुळे संशयाची सूई त्याच्या दिशेने वळाली अन् त्याचा पर्दाफाश झाला.



Source link