Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती कृषी बाजार समितीतून आंब्याचा पहिला कंटेनर लंडनला रवाना

बारामती कृषी बाजार समितीतून आंब्याचा पहिला कंटेनर लंडनला रवाना

बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारातील निर्यात सुविधा केंद्रातून चालू हंगामातील पहिला आंब्याचा कंटेनर लंडनच्या दिशेने रवाना झाला. बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या निर्यात प्रक्रियेस प्रारंभ केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून 2007 मध्ये जळोची येथे हे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले. त्याच धर्तीवर आता मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे आणि भाजीपाला हाताळणी केंद्रही उभारण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर बाजारपेठ मिळेल, असा विश्वास सभापती आटोळे यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी या केंद्रातून 485 टन आंब्याची निर्यात ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका आणि चीन या देशांमध्ये झाली होती. यंदा पहिल्या टप्प्यात 10 टन आंबा लंडनला पाठवण्यात आला. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करून रेसिड्यू-मुक्त, निर्यातक्षम आंब्याचं उत्पादन करावं, जेणेकरून अधिकाधिक लाभ मिळू शकेल, असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले.

रेनबो इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून आंबा निर्यात केली जात असून, गेल्या 15 वर्षांत देवगड हापूस आणि केशर आंबा लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि चीनमध्ये पाठवण्यात आला आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमधील शेतकऱ्यांचा सहभाग असून, त्यांना उत्तम बाजारभाव मिळत आहे.

“पहिला कंटेनर लंडनला पाठवला असून, ऑर्डरनुसार इतर देशांमध्येही निर्यात करणार आहोत,” असे रेनबो इंटरनॅशनलचे मालक अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी सांगितले.

सभापती व सचिवांनी निर्यातदारांना शुभेच्छा दिल्या असून, हा उपक्रम आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments