सभासदांची दिशाभूल करून सत्ता हस्तगत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसणार
फलटण – जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १५-१६ वर्षांपासून श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवत आहे. त्यामुळे श्रीराम संचालक मंडळाकडे कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत. आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळे करण्याची संधीच नसल्याचे विरोधकांनाही ठाऊक आहे. मात्र, खोटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करत निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र, श्रीरामचे सभासद सुज्ञ, अभ्यासू आणि जाणकार आहेत. त्यामुळे विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असा ठाम विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि ॲड. नरसिंह निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही परिषद घेण्यात आली होती. यावेळी युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
श्रीराम-जवाहरचे आर्थिक ताळेबंद स्पष्ट
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगच्या नावाने गाळप परवाना मिळालेला होता. साखर पोत्यांवर त्या संस्थेचे नाव होते. ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक देखील त्या संस्थेचेच होते. मात्र, सभासदांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे आरोप करण्यात आले. सर्व संबंधित कागदपत्रे पत्रकारांना दाखवत हे आरोप निराधार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले.
श्रीरामचा आर्थिक डोलारा आणि जबाबदारी
श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत गेला होता. त्याचे नक्त मूल्य कमी असल्याने कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संचालक मंडळाला हा कारखाना चालविणे शक्य झाले नाही. सहकार खाते आणि मंत्री समितीच्या मान्यतेने वस्तुस्थिती समजावून सांगून श्रीराम कारखाना चालविण्यास देण्यात आला. मात्र, सभासदांना एफआरपीनुसार ऊसदर आणि कामगारांना नियमानुसार पगार मिळेल याची पूर्ण दक्षता घेतली गेली असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
गाळप क्षमतेबाबत दिशाभूल करणारे आरोप
गाळप क्षमता वाढविताना जुन्या मशीनरीचा विस्तार केला जातो. त्यात बॉयलर आणि मिलसारखी यंत्रणा जुन्या सेटअपवर आधारीत असते, मात्र, काही भाग नवा बसवावा लागतो. प्रतिदिन २,५०० मेट्रिक टन गाळप होत होते, ते आता ४,५०० ते ५,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे. आगामी काळात गाळप क्षमता १०,००० मेट्रिक टनांपर्यंत जाईल, अशी खात्रीही संजीवराजे यांनी दिली.
मतदार यादीत कोणतीही त्रुटी नाही
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि साखर संचालकांनी तपासून मान्य केली आहे. विरोधकांनी मयत सभासदांचे वारस, शेअर्सची रक्कम पूर्ण असणे आणि जमिनीच्या नावावर सभासद असणे यासंदर्भात आक्षेप घेतले आहेत. मात्र, कोणाचाही मतदानाचा हक्क डावललेला नाही. मयत सभासदांच्या वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळताच ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर आणि वेळेवर पेमेंट
माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्यांच्या ऊस दराशी तुलना करताना, श्रीरामने नेहमी एफआरपीपेक्षा अधिक दर दिला आहे. यावर्षी संपूर्ण गाळप हंगाम संपताच ऊस उत्पादक, तोडणी कामगार आणि वाहतूकदार यांना संपूर्ण पैसे वेळेत अदा करण्यात आले आहेत. कामगारांचे पगारही नियमाप्रमाणे दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सभासदांच्याच मालकीचा
श्रीराम कारखाना सभासदांच्याच मालकीचा आहे आणि भविष्यातही राहील. करार संपल्यानंतरही विस्तार केलेली संपूर्ण मशीनरी श्रीरामच्या मालकीची असेल आणि कोणतेही कर्ज किंवा बोजा कारखान्यावर राहणार नाही. त्यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये, असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले.
फलटण दूध संघाला ऊर्जितावस्था देणार
फलटण तालुका दूध संघ अद्याप कार्यरत आहे, आणि त्याला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील अनेक सहकारी दूध संघ बंद पडले असताना, फलटण दूध संघ टिकून आहे. लवकरच या संघाला अधिक मजबूत करण्याचे आश्वासन संजीवराजे यांनी दिले.
नवीन संस्था उभारण्यापेक्षा जुन्यांचे पुनरुज्जीवन अधिक कठीण
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजोबांनी उभारलेल्या संस्थांना सशक्त करण्याचे काम केले आहे. मोटार मालक सहकारी संस्थेची उलाढाल कोट्यवधींची असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीराम साखर कारखाना, फलटण दूध संघ, साखरवाडी कारखाना आणि ग्रामविकास सोसायट्या पुन्हा उभारण्यासाठी मोठ्या मेहनतीची गरज होती. नवीन संस्था उभारण्यापेक्षा जुन्या संस्थांचे पुनरुज्जीवन अधिक कठीण असते, असे संजीवराजे यांनी स्पष्ट केले.