पुणे – एका विवाह प्रस्तावावरून झालेल्या वादात गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दिलीप यल्लप्पा अलकुंटे (वय ४५) या कामगाराची मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामजी निलू राठोड, अनुसया रामजी राठोड, करण रामजी राठोड आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे काही काळपूर्वी निधन झाले होते. गॅरेजवर काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिलीप यांनी रामजी राठोड या बिगारी कामगाराकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची विचारणा केली होती. यावरून वाद निर्माण झाला आणि “तुझे वय काय आणि आमच्या मुलीचे वय काय?” असा सवाल करत रामजी राठोड व त्याच्या कुटुंबीयांनी दिलीप यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी सळ्याने बेदम मारहाण केली.
ही घटना शनिवारी रात्री गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदान परिसरात घडली. गंभीर जखमी अवस्थेत दिलीप यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान दिलीप यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात खूनाचा कलम वाढवले आहे.
पोलिस तपास:
या प्रकरणी दिलीप यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी रामजी राठोड व अनुसया राठोड यांना अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.