लग्नाच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक! फलटण ग्रामीण पोलिसांची पाच जणांवर कारवाई

0
3
लग्नाच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक! फलटण ग्रामीण पोलिसांची पाच जणांवर कारवाई

फलटण – लग्न जुळवण्याच्या बहाण्याने 44 वर्षीय शेतकऱ्याची सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणुकीची संपूर्ण कथा:

शेतकरी असलेल्या फिर्यादीला विवाह जुळवण्यात अडचणी येत होत्या. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत पुण्यातील छाया साठे आणि जयश्री दत्तू शिंदे या महिलांनी त्यांची साथीदार दिपाली प्रभू जाणे हिचे लग्न फिर्यादीशी लावून दिले. मात्र, दिपाली विवाहित असल्याचे लग्नानंतर काही दिवसांनी उघड झाले. या बदल्यात आरोपींनी फिर्यादीकडून पावणेतीन लाख रुपये उकळले.

याबाबत फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर आरोपींनी आणखी एका मुलीचा प्रस्ताव देत दीड लाख रुपयांची मागणी केली. दि. 27 जानेवारी रोजी फलटण एसटी स्टँडवर नवरी मुलगी आणण्याच्या बहाण्याने शशिकला जाधव, गजानन डाखोरे, सुमित्रा डाखोरे आणि गोकुळ लोंढे हे खोटे नातेवाईक बनून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांची वेळीच कारवाई

फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी त्वरित फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत पाच आरोपींना अटक केली.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत असून, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.