
राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत माझ्या नादी लागू नका, अन्यथा राज्यात एकही सभा घेऊ देणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे व शरद पवारांना दिला होता. यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या व शेण भिरकावले होते. त्यांनतर त्यांच्या कार्यक्रमातही घुसून राडा केला होता. मनसेच्या या राड्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले असतानाच आता राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्ट करत महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. तुम्ही जशास तसं नव्हे तर जशास दुप्पट प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, आता सुमारांच्या नादी लागू नका, असे सांगत राज ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.







