
भारतात केेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता अगदी मोकळेपणाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे, संघासाठी काम करता येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने याबाबत १९६६ पासून असलेली बंदी ५८ वर्षानंतर म्हणजे ९ जुलै २०२४ रोजी उठवली आहे. या निर्णयानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी सर्वप्रथम बंदी हटवण्याच्या अध्यादेशाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर आता सरकारने हे मान्य केलं आहे. तसेच भाजपने स्वागत केलं आहे. एमआयएम खासदार असदुद्दिन ओवेसी, शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली ९९ वर्ष देशाचे पुनर्निमाण आणि देशाच्या सेवा कार्यात संलग्न असल्यचं सांगत सरकारच्या निरणयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान, गेली १० वर्षे मोदींच्या हातात पूर्ण बहुमतात देशाची सत्ता असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित बंदी आदेश रद्द करण्याचा निर्णय आत्ताच का घेतला गेला, याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे.