
केरळमधील एकमेव खासदार असलेल्या सुरेश गोपी यांची चांगलीच लॉटरी लागली. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्यानंतर शपथविधीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा करीत आहे.
BJP MP Suresh Gopi : लोकसभेच्या निकालानंतर एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला होता. काल पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेत नवा विक्रम नावावर केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री, तसेच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये त्यांच्याबरोबर एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपाचे पहिले आणि एकमेव खासदार सुरेश गोपी यांचादेखील समावेश आहे.
पक्षाकडे मंत्रीपद मागितलं नव्हतं
केरळचे एकमेव खासदार असलेले सुरेश गोपी यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आता ते मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर सुरेश गोपी यांनी नवी दिल्लीत एका मल्याळम वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी मोदींकडे किंवा पक्षाकडे मंत्रीपद मागितलं नव्हतं. मला माझ्या मतदारसंघात काम करायचं आहे, त्याचबरोबर माझे अपूर्ण राहिलेले चित्रपट मला साईन करायचे आहेत. मला आशा आहे की, ते लोक (एनडीए) लवकरच मला पदमुक्त करतील.









