
‘ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात काँग्रेस, इंडिया आघाडी, राजद आणि समाजवादी पक्षाचे गणित बिघडवण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली : ‘ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात काँग्रेस, इंडिया आघाडी, राजद आणि समाजवादी पक्षाचे गणित बिघडवण्याची चिन्हे आहेत. तेलंगणाखेरीज या तिन्ही राज्यांत लोकसभेसाठी पक्ष उमेदवार देणार आहे. यातील तीन उमेदवारांची नावे पक्षाने आज जाहीरही केली आहेत. मुस्लिम मतदार ही पक्षाची व्होटबँक असल्याने काँग्रेस, सपा आणि राजदच्या पारंपरिक मतदारात फूट पडण्याचा धोका आहे.
बिहार, उत्तर प्रदेश आणि विदर्भासह महाराष्ट्रात एमआयएम नेमक्या किती जागा लढवणार याचा निर्णय व्हायचा असला तरी पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात 6 जागा लढविणार असल्याचे आधीच सांगितले आहे. यात औरंगाबादसह मुंबई, नांदेड, धुळे आणि विदर्भाच्या पूर्व भागातील मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये 11 जागा लढविण्याचा पक्षाचा मनसुबा आहे.










