
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायींसाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी एक खास मागणी केली आहे. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.



