
रविवारी दिवाळीनिमित्त सायंकाळी शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात केवळ पाच तासांच्या अवधीत तब्बल २३ ठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत या घटना आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. रविवारी सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घराच्या छतावर साठलेला पाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या. सुदैवाने यातील कोणत्याही घटनेत कोणी जखमी किंवा जिवत हानी झाली नाही.






