
फलटण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अल्पावधीत प्रभावीपणे उभे केले असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद सदस्या वैशाली संदीप कांबळे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत ८ पैकी ५ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला, तर पंचायत समितीमध्ये १६ पैकी ८ जागा पक्षाच्या पारड्यात पडल्या. या यशामागे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क महत्त्वाचा ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, अत्यंत कमी कालावधीत संजीवराजे यांनी पक्ष संघटनाला नवी दिशा दिली. ग्रामीण भागात युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेबद्दल युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेली जवळपास ३० वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून, निंबाळकर घराण्याचा राजकीय व सामाजिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारण आणि राजकारणात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे शिवसैनिकांचे मत आहे.
फलटण तालुक्यात शिवसेनेच्या १०० शाखा स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला असून, आतापर्यंत जवळपास ४० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील युवक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.







