
फलटण :- फलटण तालुक्यातील बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही निवड सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वैशालीताई कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उच्च शिक्षित व तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या वैशालीताई कांबळे या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन समाजसेवा करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांची समाजकल्याण समितीवर निवड केली आहे.
समाजातील वंचित व गरजू घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे, त्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच शिवसेनेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, भोजराज नाईक निंबाळकर, शंभूराज नाईक निंबाळकर, मेघराज नाईक निंबाळकर तसेच शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वैशालीताई कांबळे यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.








