
नातेपुते :- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात आज पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून फोंडशिरसकडे जात असलेली इर्टिगा कार जुन्या पालखी महामार्गावरील निरा उजव्या कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. ही घटना सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत प्रीती टिळेकर, हनुमंत जठार आणि मंजू जठार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चालक सुनील टिळेकर हे मात्र सुदैवाने बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने कठडा तोडत थेट खोल कालव्यात झेप घेतली. अपघात इतका गंभीर होता की कारमधील तिघांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे नातेपुते परिसरात शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






