धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे

0
62
धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे

धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे – सतीश कांबळे


फलटण : भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून या संस्थेच्या वतीने आदर्शांमध्ये सम्राट अशोकाच्या प्रतिमेला स्थान देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत करूया. संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन मौजे विंचूर्णी येथे आपण करावे. कोणत्याही धम्म प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याची मी आपणाला विनंती करत आहे. प्रत्येक धर्माची आचरण पद्धती व विचारसरणी वेगळी आहे. आपल्या धम्मामध्ये सफेद वस्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सफेद वस्त्र परिधान करून आपण उपस्थित राहण्याची सुरुवात करूया. सम्राट अशोकाच्या जीवनकार्याचा प्रवास विस्तीर्ण आहे. हा संपूर्ण देश सम्राट अशोकाच्या काळात बौद्धमय झाला होता. संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सम्राट अशोकाचे योगदान आहे. आज आपली राजमुद्रा, तिरंग्यावरील अशोक चक्र हे त्याची साक्ष देत आहे.भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वच्यावतीने मौजे विंचूर्णी येथे आयोजित चैत्र पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी चैत्र पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा, अष्टमी याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण उपोसथ व्रत धारण करावे. त्यासोबतच अष्टशिलाचे पालनही करावे.
ते पुढे म्हणाले, ‘सुजाता खीर दान हा केवळ एक धार्मिक प्रसंग नाही, तर तो मानवतेचा, करुणेचा आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण आहे. या एका साध्या कृतीने जगाच्या इतिहासाला नवी दिशा दिली.सुजाता ही उरुवेला (आताचे बोधगया परिसर) येथे राहणारी एक श्रद्धाळू स्त्री होती. तिने एका वृक्षदेवतेला नवस केला होता की, तिची इच्छा पूर्ण झाली तर ती खीर अर्पण करेल. सुजाता खीर देताना बोधिसत्वाला म्हणाली मी दिलेल्या खिरीला आपण कृपा करून ग्रहण करावे. माझे मनोरथ जसे सफल झाले तसे तुमचेही होवो.असे म्हणून ती खिरीचे सुवर्णपात्र तिथेच ठेवून परतली. खीर प्रशांत केल्यानंतर बोधिसत्वाला थोडं बळ आले आणि ते पुन्हा ध्यान आणि चिंतनासाठी सुसज्ज झाले.
दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केल्यानंतर सिद्धार्थ गौतम अत्यंत अशक्त झाले होते. त्या अवस्थेत ते उरुवेला येथे एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते.
सुजाताने त्यांना पाहिले आणि ती त्यांना वृक्षदेवता समजली. नवस पूर्ण करण्यासाठी तिने प्रेमाने आणि श्रद्धेने तयार केलेली खीर त्यांना अर्पण केली. सुजाताच्या खिरीमुळे सिद्धार्थ गौतमाला नवचैतन्य मिळाले. त्यांनी अतितपश्चर्या सोडून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.याच शक्तीच्या जोरावर त्यांनी पुढे बोधगया येथे बोधीवृक्षाखाली ध्यान करून सम्यक ज्ञान (बुद्धत्व) प्राप्त केले.
स्त्रीचे योगदान आणि करुणा यांचे महत्त्व अधोरेखित होते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मध्यम मार्ग (अतिरेक टाळणे) हा जीवनाचा योग्य मार्ग आहे. सुजातामुळेच सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाकडे प्रवास करण्यासाठी मदत झाली. जगाला बुद्ध प्राप्त झाले.

भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्यआयु. चंद्रकांत मोहिते यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे लवकरच उपासिका शिबिर लावण्याविषयी व समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण शिबिर लावण्याचा निर्धार केला. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे येत्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकाची प्रतिमा ही आपल्या आदर्शमध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये लावण्याच्या आदेश विचारात घेऊन सर्वांनी त्याचे पालन करावे असे आव्हान केले.
आयु.अजित अहिवळे व हनुमंत अहिवळे यांनी खिरदान केले.

यावेळी दलित पँथर महाराष्ट्र राज्य सचिव रोहित अहिवळे, हनुमंत अहिवळे पोलीस पाटील विंचूर्णी, अजित अहिवळे, ओम निंबाळकर, प्रेम जगताप, सुरज अहिवळे, विंचूर्णी गावातील बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.