नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव

0
11
नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव

नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव करण्याचा धम्माधिष्ठित क्रांतिकारी निर्णय


फलटण : घरात लेकराचं आगमन म्हणजे केवळ आनंदाचा क्षण नसतो, तर तो धम्म, करुणा आणि समतेच्या मूल्यांना नव्याने उजाळा देणारा मंगल प्रसंग असतो. अशीच धम्ममय अनुभूती भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे यांच्या कुटुंबात अनुभवायला मिळाली. त्यांचे सुपुत्र आयु. विजय व स्नुषा आयु. रजनी यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून, या चिमुकलीचे ‘अनित्या’ असे नामकरण करत बौद्ध धम्मपरंपरेनुसार अत्यंत हर्षोल्हासात व पुष्पवृष्टीत तिचे स्वागत करण्यात आले.

या सोहळ्याला बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या हस्ते बुद्धपूजा व धम्मविधी पार पडत, त्रिशरण-पंचशीलाच्या साक्षीने वातावरण धम्ममय झाले. हा सोहळा केवळ स्वागताचा नव्हे, तर समता, करुणा आणि प्रज्ञेच्या मूल्यांचा जागर करणारा ठरला.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर, राज्य संघटक व सातारा-पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, तसेच आयु. बाबासाहेब जगताप, आयु. रामचंद्र मोरे, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, ऍड. चंद्रशेखर मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी धम्मातील समतेचा मूलभूत विचार स्पष्ट करत सांगितले की, “धम्मामध्ये स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नाही. प्रत्येक जीवाला समान मान देणारा धम्मच खऱ्या अर्थाने मानवतेचा मार्ग दाखवतो. निकाळजे परिवाराने भीम कन्येचे स्वागत करून या समतेच्या विचाराला कृतीत उतरवले आहे.”

संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी मुलीच्या जीवनप्रवासातील त्याग, समर्पण आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण करत सांगितले की, “तथागत गौतम बुद्धांच्या माता महामाया पासून ते महाउपासिका मीराताई आंबेडकरांपर्यंत स्त्रियांनी समाज परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. मुलगी ही करुणा, धैर्य आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. तिच्या स्वागताचा हा सोहळा म्हणजे धम्ममूल्यांचा सन्मान आहे.”

यावेळी आयु. दादासाहेब भोसले यांनी धम्माच्या प्रज्ञा आणि दूरदृष्टीचा दाखला देत मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा स्वीकार करत आयु. विठ्ठल निकाळजे यांनी आपल्या नाती ‘अनित्या’च्या नावाने एक लाख रुपयांची ठेव करण्याची घोषणा केली. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे, तर धम्माच्या ‘प्रज्ञा व करुणा’ या तत्त्वांवर आधारलेला क्रांतिकारी उपक्रम ठरला.

आयु. बाबासाहेब जगताप यांनी मुलगी ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर तीन कुटुंबांना जोडणारी सशक्त कडी असल्याचे सांगत, तिच्या माध्यमातून बुद्ध, धम्म आणि संघाचे विचार अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या सर्व मनोगतांनंतर आयु. विठ्ठल निकाळजे यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “धम्माच्या विचारांनी प्रेरित होऊनच आम्ही हा सोहळा साजरा केला आहे. आमच्या नातीचे आयुष्य समतेच्या, करुणेच्या आणि प्रज्ञेच्या मार्गावर सुखी, समाधानी व कर्तृत्ववान व्हावे, हीच आमची मनापासून इच्छा आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सरणतंय घेऊन या धम्ममय आणि प्रेरणादायी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी विजय निकाळजे, रजनी निकाळजे, अजय निकाळजे, साळूताई निकाळजे, प्रशांत काकडे, अरविंद काकडे, शोभा काकडे, काजल काकडे, राजू झेंडे, रितेश झेंडे, रेश्मा झेंडे, साक्षी झेंडे, प्रांजली झेंडे, निलम बनसोडे, सागर भोसले, रेश्मा भोसले, वैभव मोरे, प्रथमेश अहिवळे, प्रथमेश काकडे उपस्थित होते.