
फलटण | प्रतिनिधी :- . फलटण तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता शिवरूपराजे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रामराजेंनी “कमळाला अनेक भुंगे लागलेले आहेत, त्यातील हा एक भुंगा” अशी टीका करत विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.
रामराजे पुढे म्हणाले, “बारामतीला जा, कोल्हापूरला जा; पण फलटणमधून तडीपार व्हा”, अशा शब्दांत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “यांचं या मातीशी नेमकं नातं काय?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी फलटणच्या राजकारणात बाहेरच्यांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली.
या वक्तव्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. रामराजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या वक्तव्यावर शिवरूपराजे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते, फलटणमधील सत्तासंघर्ष आता अधिक गडद व आक्रमक होत चालला आहे








